CV Ananda Bose Sarkarnama
देश

CV Ananda Bose : ऐन लोकसभेच्या धामधुमीत राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; काय आहे प्रकरण?

Sunil Balasaheb Dhumal

West Bengal Political News : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही आनंदा बोस यांनी राजभवनातच एका महिलेचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप होत आहे. आता हे प्रकरण पश्चिम बंगालचे तृणमूल काँग्रेस सरकारने उचलून धरले आहे. मात्र हे आरोप चुकीचे असल्याचे सांगून बोस यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ऐन लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या या आरोपांनी पश्चिम बंगालमध्ये भाजप, राज्यपाल आणि तृणमूल काँग्रेस सरकार यांच्यातील वाद वेगळ्या वळणावर गेला आहे.

राजभवनात नेमकं काय घडलं?

राजभवनात एक महिला कर्मचारी 2019 पासून काम करत असून ती तेथीलच निवासस्थानी राहत आहे. तिने आपला लैंगिक छळ झाल्याचे राजभवनातील पोलिसांना सांगितल्यानंतर हे प्रकरण बाहेर आले. संबंधित महिला कर्मचाऱ्याने तिचा दोनदा लैंगिक छळ झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. राज्यपालांविरोधात झालेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तपास पथक तयार केले आहे.

पहिल्यांदा 19 एप्रिल रोजी राज्यपालांनी तिला तिचा बायोडाटा घेऊन कार्यालयात भेटायला बोलावून घेतले होते. तर दुसऱ्या वेळी 24 एप्रिल रोजी दुपारी पावणे एकला त्यांनी कार्यालयातील एका खोलीत बोलावले. तेथे काही वेळ चर्चा केल्यानंतर राज्यपाल बोस यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यावेळी कसेतरी करून त्या खोलीतून बाहेर पडल्याचेही महिलेने सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर 2 मे रोजी राज्यापालांनी पुन्हा त्या महिला कर्मचाऱ्यास बोलावून घेतले. मात्र घाबरल्याने त्यावेळी तिने एका सहकाऱ्यास बरोबर नेले होते. तेथे काही वेळ बोलल्यानंतर राज्यपालांनी सहकारी कर्मचाऱ्यास बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी महिला कर्मचाऱ्याशी प्रमोशनबाबत चर्चा केली. त्यानंतर रात्री कॉल करतो, त्याबाबत कुणाला काही सांगू नकोस, असेही राज्यपालांनी सांगितले. त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी पुन्हा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असता त्या तेथून पळून गेल्या.

राज्यपालांवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांना पोलिस उपायुक्त इंदिरा मुखर्जींनी दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले, या प्रकरणी २ मे रोजी सायंकाळी पोलिस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली. आता ते प्रकरण हेअर स्ट्रीट पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. ही तक्रार महामहिम राज्यपालांविरुद्ध असल्याने चौकशीसाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने तृणमूल काँग्रेसने बोस यांच्यावर राजभवनाचा अनादर केल्याचा आरोप केला आहे. हा सर्व प्रकार भयानक, धक्कादायक आणि अकल्पनीय असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. राज्यपालांच्या कृतीने आपल्या घटनात्मकतेचे प्रतीक असलेल्या राजभवनाचे पावित्र्य डागाळले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री मुक्कामी येण्यापूर्वी काही तास आधीच राजभवनात राज्यपालांनी नोकरीच्या बहाण्याने एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, राज्यपालांनी अनधिकृत, बेकायदेशीर, लबाडीच्या नावाखाली पोलिसांना राजभवनात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी राजकीय हेतूने प्रेरित तपास केला आहे, असे आरोप राज्यपाल बोस यांनी केला आहे. त्यामुळे राज्यपाल आणि राज्य प्रशासन यांच्यातील संघर्ष वाढला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT