Mumbai News: देशात 2014, 2019 आणि 2024 अशा सलग तीन लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव सामोरे गेलेल्या काँग्रेसला बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, हरयाणा यांसारखी राज्येही गमवावी लागली. दिवसेंदिवस काँग्रेसची अवस्था सुधारण्याऐवजी आणखीच बिकट होत चालल्याचं पाहायला मिळत आहे. पण काँग्रेसच्या या अधोगतीला ज्या निवडणुकीपासून सुरुवात झाली,त्याच 2014 च्या निवडणुकीबाबत आता काँग्रेसच्या (Congress) माजी खासदारानं केलेल्या धक्कादायक दाव्यांमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
माजी खासदार कुमार केतकर यांनी संविधान दिनानिमित्त आयोजिक एका काँग्रेसच्या कार्यक्रमात या मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, 2014 लोकसभा निवडणुकीतील निकाल हा जनादेश नव्हता. तर परदेशातील गुप्तचर यंत्रणांनी भारतात काँग्रेस किंवा काँग्रेससह मित्रपक्षांचं सरकार स्थापन होऊ द्यायचं नाही, असं ठरवल्यामुळेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याचा धक्कादायक आरोप केतकर यांनी केला आहे.
केतकर म्हणाले, देशात 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी तत्कालीन काँग्रेस सरकारबद्दल नाराजी होती. पण त्यावेळी आलेला निकाल हा काही जनादेश नव्हता. त्यावेळी काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए आणि इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद यांनी कट रचला होता असा खळबळजनक दावा करणारा कुमार केतकरांचा व्हिडिओ पीटीआय या वृत्तसंस्थेनं शेअर केला आहे.
पीटीआयनं शेअर केलेल्यात व्हिडिओत केतकर यांनी 2004,2009 या दोन निवडणुकांमधील काँग्रेसनं जिंकलेल्या जागांची आकडेवारीही मांडतानाच 2014 च्या निकालाबाबतही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, काँग्रेसनं लोकसभेच्या 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत 145 जागा जिंकल्या तर 2009 च्या निवडणुकीत तब्बल 206 वर पोहोचल्या होत्या.
2014 च्या निवडणुकीत हाच ट्रेंड कायम राहिला असता तर काँग्रेसला 250 जागा मिळाल्या असत्या. यामुळे काँग्रेस 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही सहज सत्तेत कायम राहिला असता. मात्र, 2014 मध्ये काँग्रेसच्या जागा थेट 44 पर्यंत खाली आल्या असं केतकर यांनी म्हटलं.
त्यावेळी पंतप्रधानपदी असलेल्या मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्याबद्दल 2014 ला देशात निश्चितपणे काही प्रमाणात नाराजी होती. पण ती नाराजी इतकी नव्हती की, त्यामुळे काँग्रेस 206 वरुन 44 वर येईल. पण त्यावेळी आलेला निकाल जनादेश नव्हता असा दावा केतकर यांनी ठामपणे केला.
या काँग्रेसच्या पराभवामागं अमेरिका अन् इस्त्रायल या दोन्ही देशांच्या यंत्रणांचा हात होता. काँग्रेस पक्ष जर सत्तेत कायम राहिला तर आपल्याला भारतात हस्तक्षेप करता येणार नसल्याचं मत दोन्ही देशांच्या यंत्रणांचं होतं,असंही केतकर यांनी या कार्यक्रमात सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.