Ajit Pawar, Raju Shetty
Ajit Pawar, Raju Shetty sarkarnama
कोल्हापूर

तर बारामतीत जाऊन अजित पवारांच्या कार्यालयावर लाथा घालणार...

सुनील पाटील

कोल्हापूर : वेळेत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले पन्नास हजार रुपये येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करावी. अन्यथा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील कार्यालयावर लाथ घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी ते बोलत होते. माजी खासदार शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. पण, प्रामाणिक आणि वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याची घोषणाही केली.

दोन वर्ष होवून गेले तरीही ही रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पन्नास हजार देणे जमत नव्हते तर त्यांनी घोषणा केलीच का? हा जाब विचारण्यासाठी बारामतीला जावे लागले. शेतकऱ्यांच्या सहशनिलतेची वाट न पाहता, येत्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्यातील प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी केवळ 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागते. ती तात्काळ केली पाहिजे, अन्यथा बारामतीत येवून पवार यांच्या कार्यालयावर लाथा घातल्या जातील. 

प्रा. जालंधर पाटील म्हणाले, ''शेतकऱ्यांना लुबाडण्याचा एकही मार्ग शासनाने सोडलेला नाही. शेतकऱ्यांच्या जीवावरच देशाचे अर्थकारण आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांना लुटायची यंत्रणा सक्रीय केली आहे.'' विजय पोवार म्हणाले, ''जिल्ह्यातील तिन मंत्र्यांपैकी एकही नेता शेतकऱ्यांच्याबद्दल आवाज उठवू शकत नाही. खतांचे दर वाढले, विज मिळत नाही, उसाला दर मिळत नसताना तिन्ही मंत्री मूग गिळून गप्प आहेत.'' यावेळी, सावकार मादनाईक, जयकुमार कोले, राम शिंदे आदी उपस्थित होते.

 प्रतिटन उसाला 200 रुपये मिळावेत

सध्या जागतिक व देशांतर्गत बाजार पेठेत साखरेला प्रतिक्विंटल 300 रुपये वाढीव दर मिळाला आहे. यातील शेतकऱ्यांना प्रतिटन 200 रुपये दर दिला पाहिजे. साखर कारखान्यांनी तात्काळ हा निर्णय जाहीर करावा. दर वाढला नाही 15 मार्चनंतर साखर कारखान्यांच्या गोडाऊनमधील एकही साखरेचे पोते बाहेर जाणार नाही. याची साखर कारखानदारांनी जाणीव ठेवावी, असाही इशारा श्री शेट्टी यांनी दिला. 

दहा तास वीज दिलीच पाहिजे...

शेती पंपाचे वीज बिले शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहेत. अव्वाच्या सव्वा बिले आकारून शेतकऱ्यांची लुट केली जात आहे. शेतकऱ्यांना वीजपंपाची दिलेली बिले तात्काळ दुरुस्त करावीत. रात्री शेतात काम करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना सर्पदंश, हत्ती, बिबट्या, तरसासह वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे शेतीला सकाळी 10 व रात्री 10 तास वीज पुरवठा केलाच पाहिजे. शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत. शेतकऱ्यांकडून विजेची मागणी असतानाही त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. चांदोली धरणावरील विज प्रकल्प सुरु करून एक लाख 50 हजार शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. सरकार या सर्व गोष्टींची पूर्तता करु शकते, पण ते करत नाहीत, असाही आरोप श्री. शेट्टी यांनी केला. 

भूमीअधिग्रहण करुनच दाखवा

कोल्हापूर-सांगली बायपास रस्ता केला जाणार आहे. हा रस्ता करताना शेतकऱ्यांच्या जमिनीला नवीन आदेशानूसार दर दिला जाणार आहे. यामध्ये शेतकरी आयुष्यातून उठणार आहे. त्यामुळे जमिन हस्तांतर करायची असेल तर जुन्या दराच मिळाला पाहिजे, नाहीतर या जमिनीच अधिगृहणच काय पण सर्व्हेही होवू देणार नसल्याचा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला. 

खतांचे दर तात्काळ कमी करा

लालबहाद्दूर शास्त्री यांनी देशात हरितक्रांती केली. परदेशात नोकरी करणाऱ्या स्वामिनाथन यांना देशात आणले आणि रासायनिक खतांचा वापर करून शेती करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे देशात अन्नधान्यांची टंचाई नाही. पण सरकार आता सेंद्रीय शेती करा म्हणून खतांच्या किंमती वाढवत आहेत. वास्तविक चार राज्यातील निवडणूका झाल्यानंतर खतांच्या किंमती पुन्हा वाढणार आहेत. केंद्र सरकार अनुदाना देण्यास तयार नाही त्यामुळे खतं कंपन्यांनी खत निर्मिती बंद केली असल्याचेही श्री शेट्टी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT