Mumbai News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला मोठे महत्व प्राप्त झाले होते. या दसरा मेळाव्यातून शिवसेना ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
शिवतीर्थावरील या दसरा मेळाव्याप्रसंगी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर तोफ डागताना राज्य सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीला टांगली. यावेळी 40 मिनिटांच्या ओघवत्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या कारभारावर तोफ डागली आहे. त्यांनी भाषणातून विमा कंपन्यांच्या नफ्यापासून ते फुटीर राजकारणापर्यंत सगळेच काढत सत्ताधाऱ्यांची बोलती बंद केली.
राज्यातील पूर परिस्थिती भयावह आहे. सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात असताना दुर्लक्ष केले जात आहे. पुरामुळे शेतकरी हताश झालाय, तो लढतोय. पण देवेंद्र फडणवीसांचा अजून अभ्यास सुरू आहे. तिकडे पंतप्रधान काहीही मदत करत नाहीत. बिहारमध्ये निवडणुका आल्यानंतर पंतप्रधानांनी तिथल्या महिलांच्या खात्यावर10-10 हजार रुपये टाकले. पण महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला काहीही मदत केली नाही. यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्राबद्दल असलेल्या द्वेषामुळे ते मदत करत नाहीत, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
मोदींना प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव करायचा आहे. जीएसटी कुणी लावला होता, नेहरूंनी लावला होता का? आठ वर्षे यांनी लोकांना लुटले, आता महोत्सव साजरा करत आहेत, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर केली. भाजपचा (BJP) कोणत्याही कामामध्ये संबंध नाही, पण त्याचं श्रेय यांनी घेतलं. बीडीडी चाळीच्या कामाचा शुभारंभ मी केला होता, जितेंद्र आव्हाडांनी त्यासाठी मेहनत घेतली होती. आता भाजपवाले म्हणतात की त्यांनीच बीडीडी चाळ उभी केली. मुंबईतील नाईटलाईफवर हे बोलत होते, पण आता त्यांनीच हा निर्णय घेतला. मकाऊमध्ये जाऊन नाईट लाईफ जगणारे आमच्यावर टीका करत होते.
सगळीकडे चिखल झाला आहे, त्याचं कारण हे कमळाबाई. कमळाबाईने स्वतःची फुले फुलवली, पण जनतेच्या आयुष्याचा चिखल केला. पण आता आपली जबाबदारी आहे. काही जणांच्या आयुष्यात फुल नाही तर फुलाची पाकळी जरी उमलवू शकलो तरी खूप झाले, असेही ते म्हणाले.
या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणाले होते. आज म्हणतात की ओला दुष्काळ असा काही प्रकारच नाही. कोणतेही निकष न लावता सरकारने हेक्टरी 50 हजार रुपये जाहीर करावे. आपलं सरकार असताना कर्ज माफी केली होती, असेही ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.