Shivsena UBT : शिवसेनेसारखी मजुबत संघटना फोडण्यात आली, याची सल मनाला कायम आहे. या महाराष्ट्रात दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे, आपली ताकद आणि सत्ता या राज्यात असली पाहिजे, असे एक शिवसैनिक म्हणून मला वाटते. या विषयावर भाष्य करावे एवढा मोठा मी नाही. पण संघटना फुटल्याची सल माझ्या मनात आहे, सगळ्यांनी पुन्हा एकत्र यावं आणि संघटनेची ताकद महाराष्ट्रात दिसावी, अशी माची इच्छा आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
एबी माझा या वृत्तवाहिनीच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात अंबादास दानवे (Ambads Danve) यांनी शिवसेनेच्या फुटीवर भाष्य केले. शिवसेना फुटल्याचे दुःख आणि सल आपल्या मनात आहे. एक मजबूत संघटना फोडली गेली, ती पुन्हा एकत्र आली पाहिजे, शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता आणि ताकद दिसली पाहिजे ही माझी मनापासून इच्छा असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. गेल्या तीन वर्षात अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून शिंदेच्या शिवसेनेला व त्यांच्या मंत्र्यांना सभागृहात अन् रस्त्यावर सडेतोड उत्तरं दिले आहे.
गद्दार, मिंधे गँग, पन्नास खोके म्हणत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena) अनेकदा अंगावर घेतले. परंतु विधान परिषदेचे सदस्य आणि विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर दानवे काहीसे मवाळ झाल्याची चर्चा आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत ही इच्छा व्यक्त करत अंबादास दानवे यांनी आपले मत परिवर्तन झाल्याचे या विधानवरून दाखवून दिले आहे. शिंदेंची शिवसेना एकत्र आली पाहिजे, ही भूमिका अंबादास दानवे यांची वैयक्तिक आहे की मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते म्हणून त्यांनी ती मांडली यालाही महत्व आहे.
शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले, हे अंबादास दानवे कसे विसरू शकतात? गेल्या अडीच-तीन वर्षात एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. रश्मी ठाकरे यांनाही यात ओढण्यात आले. अशा सगळ्या घटना आणि प्रकारानंतर अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, ही इच्छा व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'मी पुन्हा येईन' यासाठी तर हा खटाटोप नाही ना? अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काय म्हणाले दानवे?
शिवसेना फुटली याची खंत असून दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अशी आपली इच्छा असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं. शिवसेना म्हणून आपण एकत्र असलं पाहिजे, शिवसेनेची एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे.आमची संघटना कुणीतरी फोडली याची सल कायम आहे. शिवसेना फुटली त्यावेळी मनाला वेदना झाल्या. आम्ही काही सत्तेसाठी जन्मलो नाही. आमची संघटना फुटली, मनाला झालेली ही वेदना कधी ना कधी भरुन यावी ही अपेक्षा आहे.
आमची एवढी मजबूत संघटना फुटली, ती कुणीतरी फोडली याची मनाला कायम सल राहिली. आता शिवसेना म्हणून एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे. तशी आशा ठेवायला काय हरकत आहे? असेही अंबादास दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.