Amit Shah News Sarkarnama
महाराष्ट्र

Amit Shah News : बाहेरून आलेल्यांमुळे नाराज पदाधिकाऱ्यांना अमित शहांचा सबुरीचा सल्ला

Jagdish Pansare

BJP Political News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप- महायुतीला मोठा फटका बसला. विशेषतः भाजपच्या खासदारांची संख्या घटली, मराठवाड्यात तर पक्षाला खातेही उघडता आले नाही. या मागील कारणांचा शोध घेतला तेव्हा बाहेरच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात आलेल्या नेत्यामुळे निष्ठावंत भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती हे स्पष्ट झाले होते. अशोक चव्हाण, अजित पवार यांना भाजपमध्ये घेतल्याने पक्षाचे नुकसान झाले, असा सूर काढण्यात आला होता.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात अमित शहा (Amit Shah) यांनी याच प्रश्नाला हात घातला. बाहेरून पक्षात आलेल्यांमुळे नाराज आहात ना? असा प्रश्न शहा यांनी जाहीरपणे विचारला आणि अनेक हात वर गेले. पण या नाराज कार्यकर्त्यांना उत्तर देतांना शहा यांनी जे काही सांगितले त्यातून एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा होत आहे. पक्षात पंधरा वर्षापासून काम करत असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते किती आहेत? त्यांनी हात वर करा, असे आवाहन शहा यांनी केले.

या हातांवर कटाक्ष टाकत, पंधरा वर्षात तुम्हाला पक्षाने काही दिले नाही, मग काल आलेल्यांना काय आणि किती मिळेल ? असे सांगत काळजी करू नका, असे म्हणत सबुरीचा सल्ला दिला. लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. काँग्रेसचा मोठा मराठा नेता गळाला लागल्यामुळे भाजपमध्ये त्यांना राज्यसभेवर खासदारकी देण्यात आली.

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार आल्यावर अशोक चव्हाण यांना मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा होती. (BJP) पण नांदेड लोकसभा मतदारसंघातच महायुतीचा पराभव झाल्याने दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्याबाबत थांबण्याचे धोरण स्वीकारले. संभाजीनगरमधील बैठकीत खुद्द अमित शहा यांनीच भाजपच्या सर्वसामान्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्नाला हात घातला तेव्हा सगळ्यांच्या नजरा अशोक चव्हाण यांच्याकडे वळल्या होत्या.

पक्षाची गरज म्हणून अनेकांना प्रवेश दिला जातो, पण त्यामुळे मुळ भाजपच्या कार्यकर्तांवर अन्याय होणार नाही, असा विश्वास अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत नाराजी, गटबाजी, मतभेद पक्षाला मारक ठरू नये, याची काळजी घेत शहा यांनी कार्यकर्त्यांना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. देशातील सतरा-अठरा राज्यात भाजपची सत्ता असल्याची आठवण करून देत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा परिणाम काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत होणार आहे, असेही शहा यांनी यावेळी सांगितले.

ज्या गोष्टी असंभव वाटतात त्यांच संभव करून दाखवण्याचे ब्रीद घेऊन मराठवाड्यात 46 पैकी 30 जागा आपल्या जिंकायच्या आहेत, असे आवाहन अमित शहा यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. राज्यातील विशेषतः मराठवाड्यात पेटलेल्या मराठा आरक्षणाची चिंता भाजप कार्यकर्त्यांना सतावते आहे, हे हेरून शहा यांनी 2017 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या पटेलांच्या आंदोलनाची आठवण करुन दिली.

गावातून बाहेर पडणे शक्य नसतांना आम्ही विरोधकांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. तेव्हा आंदोलनाची चिंता फडणवीस यांच्यावर सोडा, तुम्ही फक्त मतदानाची टक्केवारी वाढवा, महायुती मराठवाड्यात तीस जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा दावा अमित शहा यांनी केला. एकूणच शहा यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांना जोमाने कामाला लागण्यासाठी उर्जा दिली, असेच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT