Vijay Wadettiwar Sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : चोर, दरोडेखोर, लुटारुंचे सरकार महाराष्ट्राच्या बोकांडी ; वडेट्टीवारांची तोफ धडाडली..

Jagdish Pansare

Latur Congress Meeting News : गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र, असं म्हणाऱ्या भाजपने हा महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवला आहे. राज्यातील उद्योग धंदे गुजरातला पळवले जात आहे, मुंबईतील दहा लाख कोटींची जमीन अदानीच्या घशात घालण्याचे आणि मुंबई साफ करण्याचे पाप राज्यातील हे त्रिकूट करत आहे. बदमाश, लुटारू, चोर, दरोडेखोरांचे हे सरकार सध्या महाराष्ट्राच्या बोकांडी बसले आहे, ते या निवडणुकीत घालवण्यासाठी एकत्र या, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केले.

काँग्रेस पक्षाने मराठवाड्याला नेहमीच झुकते माप दिले आहे. मराठवाड्यातून तीन मुख्यमंत्री आणि केंद्रात दोन गृहमंत्री याच मराठवाड्यातून दिल्याचे सांगत येत्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातून सर्वाधिक आमदार निवडून द्या, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले. लातूर येथील काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात विजय वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) यांची तोफ चांगलीच धडाडली. राज्यातील महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.

पहिल्यांदा निवडून आलेल्या मराठवाड्यातील तीनही खासदारांनी आपली धमक लोकसभेत दाखवली. आता विधानसभेला तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे, असे सांगत खासदार कल्याण काळे, शिवाजी काळगे, वसंतराव चव्हाण यांचे वडेट्टीवार यांनी कौतु केले. राज्यातील महायुती सरकारवर टीका करताना चोर, डाकू, लुटेरे, बदमाश, बेशरम सरकार महाराष्ट्राच्या बोंकडी बसले आहे. ही लुटारूंची टोळी महाराष्ट्राची तिजोरी लुटत आहे.

लोकसभेला झटका अन् लाडकी बहीण आठवली..

लोकसभा निवडणुकीत झटका बसल्यावर यांना लाडकी बहीण आठवली, असा टोला लगावत दीड हजार देतील आणि तीन हजारांनी तुमचा खिसा कापतील, अशी टीका वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत केली. (Congress) या चोरांपासून सावध राहा, राज्यात महिला सुरक्षित नाही, तरुणी गायब होतायेत, महिलांच्या संरक्षणाची हमी सरकारला देता येत नाही अन् म्हणे लाडकी बहीण, असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला.

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची त्यांनी आवर्जून आठवण काढली. विलासराव देशमुख यांच्यासोबत आम्ही काम केले आहे. 2004 मध्ये राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना स्काॅलरशिप देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता, असे सांगत जनगणना करा आणि ज्यांची संख्या जितकी तितका त्याचा वाटा, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

सत्तर हजार कोटींचा घोटाळा तरी तिजोरीच्या चाव्या..

लोकसभा निवडणुकीत `चारसौ पार` चा नारा देणाऱ्या भाजपची खिल्ली उडवतांना चारसौ पार म्हणणाऱ्यांची राहुल गांधींनी जिरवली. लोकसभेतून यांना आता पळ काढवा लागत आहे. ते घाबरतात, छप्पन इंच छातीवाले आता वाकून चालतात. ही किमया राहुल गांधीची आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. देशात एकच नाव, अगली आंधी राहुल गांधी, इतिहासात दुसरा गांधी म्हणजे राहुल गांधी, असे म्हणत वडेट्टीवार यांनी त्यांची तुलना महात्मा गांधी यांच्याशी केली.

भ्रष्टाचारी सगळे पळाले, सत्तार हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप पंतप्रधान करतात आणि चौथ्या दिवशी अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून बेटा अजित म्हणाले. आज त्यांच्याकडेच राज्याच्या तिजोरीची चावी दिली, अन् भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची भाषा करताय, अशी टीका वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली. पण महाराष्ट्रातील जनता तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. एका ताकदीने एकत्र या, मी विश्वासाने सांगतो महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल आणि काँग्रेसचा तिंरगा विधानसभेवर फडकेल.

महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवला..

आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या स्वाभीमानासाठी लढावे लागले. कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र म्हणमाऱ्यांनी तो गुजरातकडे गहाण ठेवलाय. अदानीला दहा लाख कोटीच्या जमीनी मुंबईत देऊन मुंबई साफ केली जात आहे. जवळच्या मित्रांचे घर भरण्याचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. जो गुजरात आमच्या मागे होता, तो आमच्या पुढे गेला, हे काम या त्रिकुटाने केले. काँग्रेसच्या काळात एका उंचीवर होता महाराष्ट्र, पण हे तिघे महाराष्ट्राला अधोगतीकडे नेत आहेत, असा घणाघात वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर नाव न घेता केला.

अमित देशमुख आता तुमचा मार्ग मोकळा झाला आहे. नांदेडची बोगी अजिबात विसरायची नाही. आरएसएसवाले आता फूल पॅन्ट अन् काळी टोपी घालू लागले आहेत. नाही तर यांना हाप पॅन्ट घालून हातात काठी घेऊन फिरावे लागले असते, असा टोला वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नाव न घेता लगावला. जास्तीत जास्त आमदार मरावाड्यातून काँग्रसचे निवडून येतील. राहुल गांधी, सोनिया गांधींच्या जास्त सभा द्या, महाष्ट्रात काँग्रेस एक नंबरचा पक्ष करून दाखवतो, असा विश्वास वडेट्टीवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT