Balasaheb Thorat, Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Balasaheb Thorat: दिवाळीत थोरातांनी अजितदादांवर टाकला 'बॉम्ब'; मोदींच्या आरोपानंतर सगळं कसं शांत?

राजेंद्र त्रिमुखे

Nagar: पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये जलसंधारणाच्या 70 हजार कोटींवर बोट ठेवत गंभीर आरोप करतात. मात्र, काही दिवसांत अजित पवार तिकडे (सरकारमध्ये) जाताच सगळं कसं शांत होते? असा निशाणा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांवर साधला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथे आयोजित कार्यक्रमात थोरातांनी केवळ अजित पवारांवरच नव्हे तर एकूणच महायुती सरकारच्या कारभारावर दिवाळीत 'बॉम्ब' टाकला.

नुकतेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यात अपेक्षेप्रमाणे बाळासाहेब थोरात गटाने बहुतांशी ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचे जलपूजन दीपावलीच्या शुभेच्छा आणि नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम तालुक्यात ठिकठिकाणी थोरातांच्या उपस्थितीत सुरू आहे.

अशाच एका कार्यक्रमात थोरातांनी आपल्या भाषणात राज्यातील महायुती सरकार आणि सरकार मध्ये सहभागी असलेले शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाच्या एकूण कामगिरीवर तुफान टोलेबाजी केली.

यात थोरातांनी अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधील पक्षाच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची थोरातांनी आठवण करून दिली. मोदींनी भोपाळमध्ये 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार सिंचन घोटाळ्यात केल्याचा आरोप केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी अजित पवार इकडे (सरकारमध्ये) येताच सगळं कसं शांत झाले, असे म्हणत थोरातांनी भाजप आणि अजित पवारांवर निशाणा साधला.

संगमनेर पोलिस ठाण्याच्या कारागृहातून चार कैदी पळल्याबद्दल थोरतांना माध्यमांनी विचारल्यावर त्यांनी, सध्या एकूणच राज्यातील सरकारची प्रशासनावर पकड आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. पोलिस वाहनातून कैद्यांना नेले जात असताना वाटेत वाहन थांबवून कैद्यांना पाकिटे दिली जातात, या प्रकाराकडे थोरातांनी लक्ष वेधत सरकारची प्रशासनावर पकड आहे का? असा प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोख केला.

राज्याला सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री असताना अनेक मुद्द्यांवर त्यांच्यात एकमत दिसून येत नाही. सरकार चाललंय म्हणून चाललंय अशी परस्थिती असून, जनतेला मात्र हे मान्य नाही, असेही थोरातांनी सरकारला सुनावले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT