Ratnagiri news : रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे दिशा समिती आणि रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या ऑनलाईन बैठकीतच मोठा हायव्होल्टेज ड्रामा पहावयास मिळाला. या ऑनलाईन बैठकीची लिंक वेळत न मिळाल्याने भास्कर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच जाब विचारला. त्यासोबतच त्यांनी सुनील तटकरेंनाही खडे बोल सुनावले. यामुळे वातावरण चांगलेच तापले. आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? आम्हाला बैठक आहे हे कळवण्याचा साधा शिष्टाचारही नाही का? असा सवाल करीत जाधव यांनी धारेवर धरत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच जाब विचारला.
रत्नागिरी येथे दिशा समिती आणि रस्ता सुरक्षा समितीच्या बैठक पार पडली. या बैठकीसाठी दूरदृश्य प्रणालीची लिंकच वेळेत न मिळाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव तब्बल दोन तास ताटकळत राहिले. दुपारी 12 वाजता होणाऱ्या बैठकीची लिंक चक्क पावणेदोन वाजेपर्यंतही न मिळाल्याने दिशा समितीची बैठक संपून गेली. अखेर रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सहभागी होताच आमदार जाधव यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच जाब विचारला. त्यासोबतच त्यांनी सुनील तटकरेंनाही खडे बोल सुनावले. यामुळे वातावरण काही काळ तापले होते.
यावेळी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, 'आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? आम्हाला बैठक आहे हे कळवण्याचा साधा शिष्टाचारही नाही का? ही नेमकी कोणती कार्यपद्धती? असा खरमरीत सवाल जाधव यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना केला. त्यानंतर, बैठकीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासमोरही त्यांनी या गंभीर हलगर्जीपणाचा जाब विचारला. एका लोकप्रतिनिधीला वेळेत बैठकीची लिंकही न पाठवता प्रशासनाने निष्काळजीपणाचा कळस गाठल्याची टीका केली.
दरम्यान, आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला भाजप नेते तथा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी भेट दिली होती. या भेटीनंतर रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेत्यांनी जाधव यांच्या ऑफिसला भेट दिली त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे त्यांच्या कडक स्वभावामुळे आणि आक्रमक शैलीमुळे सर्वपरिचीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामध्ये, नार्वेकर काय कोण लागून गेला आहे का? असे त्यांनी म्हटल्यावरुन वाद निर्माण झाला होता. तर, विधिमंडळ अधिवेशनातही त्यांचा आक्रमकपणा सभागृहात दिसून आला होता. त्यानंतर आजच्या कार्यक्रमात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.