अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सुनावणी दरम्यान महाअधिवक्ता सराफ यांनी जरांगे यांनी हमी पत्राचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
न्यायालयाने नाराजी व्यक्त करत आंदोलकांना मुंबईबाहेरच थांबवण्याचे आदेश दिले.
Mumbai News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून मराठा आंदोलक आता आक्रमक होताना दिसत आहेत. दरम्यान जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुनावणी दरम्यान महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी जरांगे पाटील यांनी आंदोलासाठी दिलेल्या हमी पत्राचे उल्लंघन केल्याचे सांगितले. तर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या युक्तीवादानंतर न्यायालयानेही आपली नाराजी व्यक्त करताना मुंबईबाहेरून आता आंदोलकांना येऊ देऊ नका. त्यांना ठाण्यातच थांबवा, आंदोलकांना कंट्रोल करा असे आदेश दिले आहेत.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी शुक्रवारपासून (ता.29) आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून आंदोलकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणातील वकील गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तीवाद करताना मराठा आंदोलकांवर अनेक आरोप केले आहेत. त्यांनी राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सगळं घडवून आणले जात आहे, असा युक्तीवाद केला आहे.
तसेच सीएसएमटी, आणि चार मोठी रुग्णालय तिथे आहेत तेथील जनजीवन आणि अत्यंत आवश्यक यंत्रणा ठप्प झाल्या आहेत, असेही सांगताना सीएसटीमधल्या तुफान गर्दीचे व्हिडिओ आणि फोटो सदावर्ते यांनी यावेळी न्यायाधीशांना दाखवले. सदावर्ते यांनी युक्तीवाद करतानाच सीएसएमटी, उच्च न्यायालय हे अत्यंत संवेदनशील ठिकाण असूनही तिथे आंदोलक फिरताना दिसत आहे. ते रेल्वे ट्रॅकवर उतरत आहेत, सगळ्या रस्त्यांवर गाड्या अडवत असल्याचा दावा देखील सदावर्ते यांनी यावेळी केला आहे.
तसेच या आंदोलनाला काही अटींसह परवानगी देण्यात आली होती. मात्र आता संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात रास्ता रोको केला जात आहे. आरक्षणाच्या राजकारणामुळे हे सगळं सुरू असून यात थेट राजकीय हस्तक्षेप आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आंदोलनकर्त्यांना रसद पुरवत असल्याचा आरोपही आपल्या युक्तीवादात सदावर्ते यांनी केला आहे.
यावरून उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करताना जरांगे यांच्यासह वीरेंद्र पवारांना नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत. या नोटीसीत नियम व अटींचे उल्लंघन होत असल्याचे कळवण्याचे आदेशही दिले आहेत. तर मराठा आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलनासाठी जागा दिली असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी मराठा आंदोलक दिसत आहेत. बाहेरून येणाऱ्या मराठा आंदोलकांना थांबण्याचे आदेश देताना CSMT, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी राज्य सरकारला दिले आहेत.
प्र.१. गुणरत्न सदावर्ते यांनी काय केलं?
उ. त्यांनी जरांगे आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
प्र.२. उच्च न्यायालयाने काय आदेश दिला?
उ. आंदोलकांना मुंबईबाहेरच थांबवण्याचे आणि नियंत्रण करण्याचे आदेश दिले.
प्र.३. जरांगे यांच्यावर कोणते आरोप झाले?
उ. त्यांनी दिलेल्या हमीनाम्याचे उल्लंघन केल्याचा आरोप न्यायालयात करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.