CM eknath Shidne New Sarkarnama
महाराष्ट्र

Rajkot Fort Statue Collapse : 'एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला मी तयार' ; शिंदेंनी मागितली माफी!

Mayur Ratnaparkhe

Rajkot Fort Chhatrapati Shivaji Maharaj Statue incident : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, माफी मागितली आणि विरोधकांवरही निशाणा साधला. शिवरायांच्या चरणी एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला मी तयार आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तर, छत्रपती शिवाजी महाराज हा काही राजकारणाचा विषय नाही, विरोधकांनी यावर राजकारण करू नये असा टोलाही लगावला.

माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे(Eknath Shinde) म्हणाले, 'अनेक विषय आहेत राजकारण करायला. छत्रपती शिवाजी महाराज ही आफली श्रद्धा आहे, अस्मिता आहे. आपलं दैवत आहे, यावर राजकारण करू नये. जर ते माफीची मागणी करत आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आणि आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या चरणांवर त्यांच्या पायावर एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला मी तयार आहे. शंभरवेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणा वाटणार नाही.

कारण, छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतो आहोत. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना देखील सुबुद्धी द्यावी आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील, यासाठी विरोधकांनी सांगितलं पाहीजे, सहकार्य केलं पाहीजे.'

याशिवाय, 'कालच्या बैठकीत नौदलाच्या अधिकाऱ्यांनी विनंती आणि मागणी केली आहे, की तो संपूर्ण परिसर संरक्षित करावा. कारण, त्यांना तेथील गोष्टींची पाहणी करणं आणि पुन्हा तिथे पुतळा उभा करणं आहे, यासाठी त्यांनी तशाप्रकारची मागणी केली आहे.'

'अजितदादांनी(Ajit Pawar) देखील लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेवून, जाहीर माफी मागितली. शिवसेना, भाजप आणि अजित पवार हे आम्ही सर्वजण महायुतीमध्ये काम करतो. छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्यासाठी राजकीय विषय होवूच शकत नाही. हा विषय तर आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे. त्यामुळेच तर कुणीही यामध्ये राजकारण करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा तिथे उभा कसा राहील, यासाठी प्रयत्न केले पाहीजे.'

काल मी अतिशय महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा(Shivaji Maharaj) पुतळा कोसळला त्या प्रकरणी दोन समित्या स्थापन केल्या गेल्या. त्या समित्या दुर्घटनाग्रस्त पुतळ्याप्रकरणी चौकशी होईल आणि कारवाई होईल. दुसरीकडे अन्य एका समितीत तज्ज्ञ, नौदलाचे अधिकारीही असतील आणि त्याच जागेवर शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा पुन्हा उभारला जावा यासाठी ही समिती स्थापन केली गेली आहे.

राजकारणासाठी अनेक विषय आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय हा काही राजकारण करण्यासाठीचा नाही. शिवाजी महाराज हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नसू शकतो. आमच्यासाठी अस्मितेचे, श्रद्धेचे प्रतिक आहे. असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT