Mumbai News : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शेतकरी सोयाबीन आणि कांद्यामुळे अडचणीत आले आहेत. राज्यातील बाजारपेठांमध्ये सोयाबीन आणि कांद्याला दर मिळत नसल्याचे समोर आले आहे. सोयाबीनला तर हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान यंदा आलेल्या अनेक अडचणींचा विचार करता पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. ते सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित पणन विभागाच्या 100 दिवसाच्या आढावा बैठकीत बैठकीत बोलत होते.
या बैठकीस पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे - बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सचिव उपस्थित होते.
यावेळी सोयाबीनची खरेदी अडथळ्या विना होण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी. समृद्धी महामार्गालगत ॲग्रो हब उभारण्यात यावेत असेही फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. तर समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या अॅग्रो हबची निर्मिती ही मॅग्नेट प्रकल्पातंर्गत करण्यात यावी. तेथे सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात. यासाठी आराखडा तयार करून सादर करावा, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या आहेत.
नोव्हेंबर नाही तर ऑक्टोंबर
पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी आधीच तयारी करण्यात यावी. ऑक्टोबर महिन्यातच सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या नोंदीसाठी नोव्हेंबरची वाट पाहू नका. त्या ऑक्टोंबर महिन्यातच पूर्ण कराव्यात. सोयाबीन खरेदीचे सर्व निकष ठरवावेत. कोणतेही अडचण अथवा सोयी-सुविधांचा अंतर्भाव राहू नये. शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी अडचणीशिवाय होण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी.
कांद्याच्या साठवणीबाबत ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यांनी कांदा साठवणीसाठी कांदा चाळ उत्तम पर्याय असून त्याची जास्त मागणी आहे. तर अधिका अधिक कांदा उत्पादकांनी कांदा चाळ घ्यावे यासाठी प्रोत्साहन द्या. कांदा चाळ संख्या वाढवाव्यात, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
ॲग्रो हबचे लोकार्पण 45 दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवन विभागाच्या 100 दिवसांच्या आढावा बैठकीत महत्वाच्या सूचना करताना ॲग्रो हबच्या उभारणीचे निर्देश दिले आहे. पणन विभागाचे अपर सचिव राजगोपाल देवरा यांनी, नवी मुंबई येथे महा बाजाराचे नियोजन असल्याचे सांगितले. तर हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल असे सांगताना तो दीडशे ते दोनशे एकरात असेल ते म्हणाले.
प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उभारण्याचे नियोजन आहे. कोकणात माशांसाठी आणि आदिवाशी भागात स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती असेल. छत्रपती संभाजीनगर येथील जाभूरगाव येथे ॲग्रो हबची उभारणी करण्यात आली असून त्याचा लोकार्पण येत्या 45 दिवसात केला जाईल असेही मंत्री जयकुमार रावल यांनी माहिती दिली आहे.
बाजार समित्यांचे उपवर्गिकरण तसेच राज्यातील १ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांचे एक ते अडीच कोटी, अडीच कोटी ते पाच कोटी, पाच ते दहा कोटी, दहा ते पंचवीस कोटी असे उपवर्गिकरण करणार असल्याची माहिती अपर सचिव राजगोपाल देवरा यांनी यावेळी बैठकीत दिली आहे.