
Shirdi News : लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका कधी होतील, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रखडलेल्या आहेत. त्यामुळे नगरपालिका व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाबाबतची उत्सुकता असतानाच आता शिर्डीतील भाजपच्या शिबीराप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबद्दल मोठे वक्तव्य केले.
शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय शिबीर सुरु आहे. या शिबीरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या (BJP) सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले. नगरपालिका व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रखडलेल्या आहेत. या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु असून 21जानेवारीला होत असलेल्या सुनावणीत या प्रकरणाचा निकाल लागेल, अशी अपेक्षा आहे. या सुनावणीत निकाल लागला तर येत्या दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडतील, असे त्यांनी स्पष्टच सांगितले.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे आपण सर्वांनी परिश्रम घेतले त्याच प्रमाणे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित भाजपच्या पदाधिकऱ्यांना केले.
“ज्यांच्यामुळे हा भगवा फेटा घालू शकलो, ज्यांच्यामुळे उद्याची पहाट ही कशी असेल हे कुणालाही माहिती नव्हती, तेव्हा शिवरायांना देव देश आणि धर्म लिहिण्याची प्रेरणा दिली, त्या जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतो”, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली. “महाराष्ट्रात जो महाविजय प्राप्त झाला, त्यासाठी मी साष्टांग दंडवत घालतो. आपल्यामुळे हा विजय मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमित शाह यांचे मानले आभार
लोकसभा निवडणुकीनंतर पार्टी हताश होती. कार्यकर्त्यांना कळत नव्हते की काय चुकले ज्यामुळे असा पराभव झाला. त्यानंतर अमित शाह यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. हजारो कार्यकर्त्यांना भेटत मार्गदर्शन केले, त्यांच्या मनात विजयाची खात्री दिली. संपूर्ण पक्ष उभा राहिला आणि हा महाविजय खेचून आणला. त्यासाठी अमित शाह यांचे खूप खूप आभार मानतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सत्ताधारी पक्षाच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला
भाजपमध्ये श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र पाळला जातो. ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले, ज्यांना नाही समजले त्यांची निवडणुकीत हालत बुरी झाली. गेल्या 30 वर्षात ही कामगिरी करणारा भाजप एकमेव पक्ष आहे. लोकसभेत आपल्या 17 जागा निवडून आल्या. पण त्यानंतर आपण प्रयत्न केले. 288 पैकी 237 जागा जिंकून आपण इतिहास निर्माण केला आणि मेरिटमध्ये पास झालो. भाजपने आजवरच्या सत्ताधारी पक्षाच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला, असेही फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.