Mumbai News: मोदी सरकारमधील केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईत येऊन ठाकरे बंधूंनाच ललकारलं होतं. त्यांनी आयआयटीच्या एका कार्यक्रमादरम्यान मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. सिंह यांनी आयआयटीच्या नावात तुम्ही ‘बॉम्बे’ कायम ठेवले, त्याचे ‘मुंबई’ केले नाही, याबद्दल मी खूश असल्याचं म्हणत नव्या वादाची वात पेटवली होती. त्यांच्या या विधानानंतर राज ठाकरेंसह मनसेच्या नेत्यांनी भाजपसह महायुतीलाही ठणकावलं होतं.पण आता याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आयआयटी बॉम्बेच्या वादात उडी घेत मोठा निर्णय घेतला आहे.
भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री जिंतेद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता केंद्रीय मंत्री जिंतेद्र सिंह यांच्या वक्तव्यावरुन उद्भवलेल्या वादावर मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बेचं आयआयटी मुंबई करण्याची विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आयआयटी बॉम्बेचं नाव आयआयटी मुंबई असं करण्याची विनंती करणारे पत्र मी स्वतः देशाचे पंतप्रधान आणि मानव संसाधन मंत्र्यांना लिहिणार आहे,असंही फडणवीस यांनी सांगितलं. याचवेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोलाही लगावला. काही लोक सोयीस्करपणे, आपल्या मुलांना ज्या शाळेत शिकवतात, त्या शाळेचं नाव बदलावं अशी विनंती करत नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांना लगावला.
मोदी सरकारमधील भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईतील कार्यक्रमात आयआयटीच्या नावात तुम्ही ‘बॉम्बे’ कायम ठेवले, त्याचे ‘मुंबई’ केले नाही, याबद्दल मी खूश असल्याचं म्हटल्यानं राजकारण तापलं आहे.विशेष म्हणजे यावेळी त्यांनी आयआयटी मद्रासबद्दलही माझ्या याच भावना असल्याचंही ठणकावून सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय अशी टीका केली आहे.
तसेच त्यांनी आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे ! असल्याचंही म्हटलं होतं.
राज ठाकरे पोस्टमध्ये पुढे म्हणतात, खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.
आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉंबे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे.
आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच ! आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं ! असंही सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.