CM Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra crime rate : 10 हजार 467 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, गुन्हेगारीत राज्य आठव्या क्रमांकावर; मुख्यमंत्री फडणवीसांची ‘झिरो टॉलरन्स’ नीती

Maharashtra CM Devendra Fadnavis Legislative Assembly emphasized adopting ‘Zero Tolerance’ policy crime rate : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना राज्यातील वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘झिरो टॉलरन्स’ नीती अवलंबणार असल्याचे सांगितले.

Pradeep Pendhare

Maharashtra government crime policy : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गुन्हेगारी अन् त्यातील घुसलेल्या राजकीय गुन्हेगारीमुळे महाराष्ट्र गाजतो आहे. अत्याचार, जीव घेणे हल्ले, खून, खंडणी, अपहरण या गुन्ह्याचे प्रकार नित्याचेच झालेत.

आता अंमली पदार्थांचा देखील विळखा महाराष्ट्राला पडू लागला आहे. या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी ‘झिरो टॉलरन्स’ नीतीचा अवलंब केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना राज्यातील गुन्हेगारीवर भाष्य करताना, ‘झिरो टॉलरन्स’ नीतीचा अवलंब करणार असल्याचे सांगितले. देशाला नव्हे, तर जगाला हेवा वाटावा, असा समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी सरकार काम करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्यात गुन्हेगारी (Crime) प्रवृत्तीवर कारवाई करीत गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कार्य करीत आहे. सर्व गुन्हेगारी प्रकारांमध्ये राज्य देशात आठव्या क्रमांकावर आहे. शहरांमध्ये होणाऱ्या गुन्हेगारीत देशात पहिल्या दहा क्रमांकात राज्यातील एकही शहर नाही. देशाच्या तुलनेत शहरी भागातील गुन्हेगारी राज्यात तुलनेने कमी आहे". राज्यात 2024 मध्ये 3 लाख 83 हजार 37 गुन्हे घडले. ही संख्या 2023 च्या तुलनेत 586 ने कमी आहेत. राज्य सरकारने ‘झिरो टॉलरन्स’ नीतीचा अवलंब केल्यामुळे गुन्हे मोठ्या प्रमाणावर उघड होत आहे, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

अँटी नार्कोटिक्स क्लबची स्थापना

गुन्हेगारी वाढण्यामागे अंमली पदार्थांची तस्करी आहे. हे लक्षात घेऊन प्रत्येक पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी सेल सुरू करण्यात आलेला आहे. या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अँटी नार्कोटिक्स क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थीच अंमली पदार्थ विक्री, साठा याची माहिती देतील. त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अंमली पदार्थांवर कारवाई

अंमली पदार्थांच्या विरोधात युवा शक्ती उभारण्यात येईल. अंमली पदार्थ विक्री, वाहतूक आणि साठा विरोधात मोहीम राबविण्यात येईल. 2023-24 मध्ये 10 हजार 467 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

महिलांवरील गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी वेगानं

महिलांवरील गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 93.72 टक्के असून बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये 98.52 टक्के आहे. 2024 मध्ये 99.52 टक्के बलात्काराच्या घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्ती आणि 0.42 टक्के घटनांमध्ये अनोळखी व्यक्तीचा संबंध असल्याचे निदर्शनास आले. बलात्कारप्रकरणी 60 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचा राज्याचा दर 2020 ते 2024 पर्यंत 45 टक्के होता, तर 2024 मध्ये हा दर 94.01 टक्के आहे. भारतीय न्याय संहितेच्या नवीन कायद्यानुसार बलात्काराच्या घटनांमध्ये दोषसिद्धी वेगाने होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT