EVM Control Unit  Sarkarnama
महाराष्ट्र

Congress News : पराभवाला ईव्हीएम जबाबदार नाही, काँग्रेस नेत्याने सांगितले वेगळेच कारण

Kailas Gorantyal on EVM Controversy : महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली जात आहे. जगातील सर्वच देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक होत असताना भारतामध्येच ईव्हीएमचा आग्रह का? असा प्रश्न केला जातो आहे.

Roshan More

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळवता आला. विरोधी पक्षासाठी आवश्यक असणारे संख्याबळ देखील महाविकास आघाडीतील पक्षांना गाठता आले नाही. या दारुण पराभवासाठी ईव्हीएमवर खापर फोडले जात आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केला जातो आहे. मात्र, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराने मात्र पराभवासाठी ईव्हीएमला जबादार न धरता पराभवाचे दुसरेच कारण दिले आहे.

जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जून खोतकर यांच्या विरोधात पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या पराभवासाठी 'लाडकी बहीण योजने'ला कारणीभूत ठरवले आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात तसेच पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव देखील याच योजनेमुळे झाला असल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यावरून देखील गोरंट्याल यांनी गरज सरो आणि वैद्य मरो, अशी अवस्था महायुती सरकारची झाली असल्याचा टोला लगावला आहे. महिलांना लाभ मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करणार असल्याचा इशारा देखील गोरंट्याल यांनी दिला आहे.

बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी

महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली जात आहे. जगातील सर्वच देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक होत असताना भारतामध्येच ईव्हीएमचा आग्रह का? अमेरिकेसारखा प्रगत देश देखील बॅलेट पेपरवर मतदान घेत आहे. भारतात देखील बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी करण्यात येत आहे.

काँग्रेस यात्रा काढणार?

ईव्हीएमवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून देखील संशय व्यक्त केला जातो आहे. मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याचे ठरवले होते मात्र प्रशासनाने त्यांना विरोध केला. मराकडवाडी येथे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भेट देणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी भेट दिली नाही. पण ईव्हीएम विरोधात राहुल गांधी हे यात्रा काढणार असल्याची काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT