Nana Patole, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole : आरक्षणविरोधी कोण आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही!

Rajanand More

Mumbai : आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षण आणि फेक नॅरेटिव्हचा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरक्षणविरोधी कोण, हे सांगताना सर्वच पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबतच्या विधानावरून त्यात भर पडली आहे.

अमेरिकेतील एका कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील आरक्षण संपविण्याविषयी महत्वाच वक्तव्य केले.याच विधानावरुन भाजप आक्रमक झाली  असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली. भाजपच्या या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा विपर्यास करून भाजप फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याची टीका पटोलेंनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाला भाजपाची मातृसंस्था आरएसएस मानत नाही.

आरक्षणाला आरएसएसचाच विरोध आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे, अशी जाहीर वक्तव्ये केलेली आहे. त्यामुळे भाजपाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांचा आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत, असा टोलाही पटोलेंनी लगावला आहे.

राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या एका विधानाची मोडतोड करुन भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे. वास्तविक पाहता आरक्षणाला विरोध हा भाजपच करत आलेला आहे. देशातील सर्व समाज घटकांना न्याय मिळावा यासाठी जातनिहाय जनगणना करावी व 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवावी हीच काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांची भूमिका आहे. परंतु भाजपचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. त्यामुळे आरक्षणविरोधी कोण आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही, असे पटोलेंनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

राहुल गांधी यांचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा या निमित्याने परत एकदा समोर आला आहे.राहुल गांधी आरक्षण संपवण्यासंदर्भात त्यांनी विदेशात एक वक्तव्य केले आहे. एका बाजूला निवडणुकीत खोटं नरेटिव्ह पसरावायचे आणि दुसऱ्या बाजूला परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करायची,हे दुर्दैवी असल्याचा हल्लाबोल फडणवीसांनी केला होता.

भारताच्या संविधानाचा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही.बाबासाहेबांना कधी लोकसभेत निवडून जाऊ दिलं नाही. दोनवेळेला षडयंत्र करून बाबासाहेबांचा पराभव करणारा हाच काँग्रेस पक्ष आहे. मतांसाठी ते खोटे नरेटिव्ह तयार करतात, हे राहुल गांधी यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT