Devendra Fadnavis On Reservation Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis On Reservation : मराठा, ओबीसींना वेडं करायचं सोडून द्या; पवार, ठाकरे, पटोलेंना आरक्षणावर फडणवीसांचा थेट सवाल

Pradeep Pendhare

Mumbai Mumbai News : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजावर थेट भूमिका मांडली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी फडणवीसांनी थेट शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना सवाल विचारला. फडणवीस यांनी हा सवाल करत मराठा आरक्षणाचा मुद्दा विरोधकांच्या कोर्टात नेऊन ठेवला.

"दुटप्पी भूमिका सोडून द्या. 'चित भी मेरी, पट भी मेरी, खडा तो मेरे बाप का', ही भूमिका तुम्ही मांडता आहात, ती सोडा. मराठा आणि ओबीसींना वेडं करायचं, दोघांना झुंजवत ठेवायचं. भांडत ठेवायचं. आम्हाला शिव्या खायची सवय आहे. आम्ही घाबरत नाही. आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या, तरी तयारी आहे. पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

भाजपचे पुण्यामध्ये महाअधिवेशन सुरू आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थित अधिवेशन होत असून, राज्यभरातून भाजप नेते पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली आहे. या अधिवेशनाला तब्येतीचे कारण देते भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अनुपस्थित राहिलेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांचे स्वागत करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. चौफेर टोलेबाजी करत नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. याचवेळी मराठा आरक्षणावर भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांकडचा आरक्षणाचा चेंडू फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या कोर्टात नेऊन ठेवला.

मतांसाठी दुफळी निर्मण करण्याचे काम सध्या राज्यात सुरू आहे. आम्ही मराठा आरक्षण (Maratha Reservation) दिले. ते उच्च न्यायालयात टिकवले. सर्वोच्च न्यायालयात देखील आरक्षण टिकवून दाखवले. दुर्दैवाने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे सरकार आले आणि मराठा आरक्षण गेल्याची टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे आरक्षण वाचण्यासाठी त्यांनी कोणताच प्रयत्न केला नाही. यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटा, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, असे महायुतीचे सरकार राज्यात आले. या महायुती सरकारने 10 टक्के आरक्षण दिले. आता भरती सुरू आहे. पोलिस भरतीत आणि इतर खात्यात हजारो मराठा युवक भरतीत उतरले आहेत. एवढं करून देखील मराठा आरक्षणाचे राजकारण सुरू आहे, असे सांगून विरोधकांच देवेंद्र फडणवीस तुटून पडले.

अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र यांचे अभिनंदन फडणवीस यांनी केले. अण्णासाहेब पाटील महामंडळाने आतापर्यंत एक लाख तरुणांना उद्योजक बनवलं आहे. सारथी आपल्या सरकारने सुरू केले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सारथी सुरू केलेले नाही, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी करून दिली. यातच मराठा आंदोलन सुरू असल्याचे सांगून त्यांनी मनोज जरांगे यांना प्रश्न न करता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना मराठा आरक्षणावरून थेट सवाल केला. देवेंद्र फडणवीस यांचा हा सवालामुळे आरक्षणाचा चेंडू फडणवीस यांनी विरोधकांच्या कोर्टात नेवून ठेवला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मराठा आंदोलन चालले आहे. मनोज जरांगे यांना माझा सवालच नाही. माझा सवाल, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना आहे. सोपा सवाल आहे. तुम्ही एकदा या आंदोलनात तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही सांगा, मराठा समाजाला 'ओबीसी'मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचे समर्थन आहे का, हे एकदा स्पष्ट करा. ही दुटप्पी भूमिका सोडून द्या. 'चित भी मेरी, पट भी मेरी, खडा तो मेरे बाप का', ही भूमिका तुम्ही मांडता आहात, ती सोडा". या ठिकाणी, मराठा आणि ओबीसींना वेडं करायचं, दोघांना झुंजवत ठेवायचं. भांडत ठेवायचं. आम्हाला शिव्या खायची सवय आहे. आम्ही घाबरत नाही आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या, तरी तयारी आहे. पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. खोटारडेपणा हा समोर आणावाच लागेल. हा जर आणला नाही, तर 'यह पब्लिक है सब जानती है', असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीशी संघर्ष करण्याचा सूचक इशारा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT