Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांची निवडणूक येत्या 18 जूनला होत आहे. त्यासाठी महायुती व महाविकास आघाडीत दुरंगी लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुतीमधील जागावाटप जवळपास ठरले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वाट्याला 17 पैकी सहा जागा मिळाव्यात यासाठी आग्रही होते. त्यासाठी शिंदे यांनी दिल्ली दरबारी अमित शाह यांची भेट घेत सहा जागांची मागणी केली होती. मात्र, विधानपरिषदेच्या जागावाटपात पुन्हा एकदा सीएम देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारत राजकारणातील चाणक्य असल्याचे सिद्ध केले आहे. जागावाटपात मित्रपक्षाला बॅकफूटवर ढकलत भाजपची सरशी झाली आहे.
आगामी काळात निवडणूका होत असलेल्या राज्यातील 17 पैकी 14 जागांवर भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांना 12 जागा मिळावा असा आग्रह होता. तर पुणे, परभणी-हिंगोली या दोन ठिकाणी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबर आहे तर एकमेव कोकण मतदारसंघात शिंदेंची शिवसेना एक नंबरवर आहे. त्यामुळे भाजपचा आग्रह योग्यच होता. मात्र, काही ठिकाणी त्यांना जागा जिंकण्यासाठी मित्रपक्षाची साथ आवश्यक होती. त्याचमुळे सीएम फडणवीस यांनी शिंदे सेनेला चार तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा देत तोडगा काढला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी पाच किंवा सहा जागा मिळायला हव्यात असा आग्रह धरला होता. त्यासाठी त्यांनी दिल्लीवारी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर दबाव ही निर्माण केला होता. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शिंदेंची मागणी पूर्ण होईल, अशी शक्यता होती. पण प्रत्यक्षात फडणवीस कोणत्या ही दबावाला बळी न पडता त्यांनी शिंदेंनाच शह दिल्याचे जागा वाटपावरून पुढे आले आहे.
विधानपरिषदेच्या 17 पैकी 6 जागा मिळाव्यात यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही होते. त्यासाठी दोन वेळा शिंदे यांनी दिल्ली दरबारी हजेरी लावली. त्यात दबाव तंत्र असल्याचं बोललं जातं. यातून किमान पाच जागा द्याव्यात, असा शिंदेंचा प्रयत्न होता. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा राजकीय डाव उलटवला आहे. भाजप सर्वाधिक 11 जागा लढणार आहे. हे जवळपास निश्चित झाले आहे. तर एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेला 4 जागा दिल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात दोन जागा पडणार आहेत. रायगड आणि पुणे अशा दोन जागा राष्ट्रवादीला मिळतील.
एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेला नाशिकसह संभाजीनगर विधानपरिषदेची जागा हवी होती. मात्र भाजप पक्षश्रेष्ठी समोर फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाम भूमिका घेतली. त्यांनी संभाजीनगरची जागा देऊ नये असे ठामपणे सांगितले. पक्षाश्रेष्ठींनाही त्यांनी हे पटवून दिली. त्यात बरोबर शिंदेंना पाच नाही तर चारच जागा दिल्या पाहिजेत असेही सांगितले. त्यामुळे शिंदेंना अपेक्षित असलेल्या जागा मिळाल्या नाहीत. एकनाथ शिंदे यांची सेना आता ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणीची जागा लढणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस रायगड आणि पुणे जागा लढवणार आहे.
सोलापूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर -जालना, अहिल्यानगर, सांगली-सातारा, नांदेड या ११ मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले आहेत. त्यामुळे एकंदरीतच महायुतीचा भाजप -11, शिवसेना-4, राष्ट्रवादी काँग्रेस-2 असे जागावाटप करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.