ठळक मुद्दे:
महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असून राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही मतदारयाद्यांची सखोल फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही गटांची धडधड वाढली असून विरोधकांकडून आक्षेप नोंदवला जाण्याची शक्यता आहे.
New Delhi News : महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंगला उधाण आलं आहे. एकीकडे स्थानिकच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्यांच्या सखोल तपासणी सुरू आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक आयोग बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी (Local Body Elections) मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याच्या तयारीत असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे.
महाराष्ट्रात दिवाळीनंतर कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी खलबतं सुरू आहे.
विधानसभेचा स्ट्राईक रेट कायम ठेवण्याचं आव्हान महायुतीसमोर तर महाविकास आघाडीला अपयशाचा ठपका पुसत पुन्हा एकदा स्थानिकच्या निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे. त्याचमुळे राज्यातील सर्वच पक्षांनी स्थानिकसाठी आत्तापासूनच जोरदार तयारी केल्याचं दिसून येत आहे.
या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षानं स्थानिक पातळीवर युती,आघाडी किंवा स्वबळाबाबतच्या निर्णयाचा सर्वाधिकार दिले आहेत. पण आता केंद्रीय निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आल्यानं सर्वच राजकीय पक्षांची धडधड वाढवली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील सर्वच राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद बोलावण्यात आली होती. आयोगाच्या याच परिषदेत देशातील मतदारयाद्यांच्या फेरतपासणीसाठी आढावा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे स्थानिकच्या निवडणुकांआधी मतदारयाद्यांच्या फेरतपासणी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदारयाद्यांच्या फेरतपासणीबाबतचा निर्णय जाहीर केला, तर यावर विरोधकांकडून राजकीय वातावरण तापवलं जाण्याची शक्यता आहे. बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाची गुरुवारी (ता.11) महत्वाची परिषद पार पडली. या परिषदेमध्ये मतदारयाद्यांची फेरतपासणीची तयारी आणि प्रत्यक्ष विशेष मतदारयादी परीक्षण कधी राबवण्यात येऊ शकतं याबाबतचा आढावा घेण्यात आला.
निवडणूक आयुक्तांच्या परिषदेत राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या.त्यात महाराष्ट्रात नवे मतदार पोलिंग स्टेशनची तयारी, निवडणुकीआधी मतदारयादीची सखोल फेरतपासणीची शक्यता यांसह 1200 हून अधिक मतदार एका मतदान केंद्रावर नसतील या विषयी दक्षता घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.