pm kisan 22nd installment date Sarkarnama
महाराष्ट्र

PM Kisan 22 Installment : बळीराजासाठी मोठी बातमी! पीएम किसानचा 22 वा हप्ता 'या' दिवशी होणार जमा? महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याने मारली बाजी!

PM kisan 22nd installment 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता लवकरच जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे ते जाणून घ्या.

Rashmi Mane

pm kisan installment release date india : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक मदतीची अनेक शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपत असून शुक्रवार, 13 मार्च रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

या निधी वितरणाचा मुख्य कार्यक्रम आसाम राज्याची राजधानी गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी हस्तांतरित केला जाणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याअंतर्गत देशातील 9 कोटी 32 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,640 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली जाणार आहे.

महाराष्ट्रातीलही मोठ्या संख्येने शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत. राज्यात एकूण 91 लाख 18 हजार 831 शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. याआधी 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास चार महिन्यांच्या कालावधीनंतर आता 22 व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

मागील 21 व्या हप्त्यावेळी राज्यातील सुमारे 90 लाख 41 हजार 241 शेतकरी पात्र ठरले होते. मात्र आता या संख्येत वाढ झाली असून 22 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 91 लाख 18 हजार 831 इतकी झाली आहे. म्हणजेच मागील वेळेपेक्षा यंदा 1 लाख 2 हजार 590 शेतकरी अधिक लाभार्थी ठरले आहेत.

दरम्यान, हा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. सुरुवातीला जानेवारी महिन्याच्या अखेरीस निधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 7 फेब्रुवारीपूर्वी हा हप्ता जाहीर होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र विविध कारणांमुळे या निधीच्या वितरणाला विलंब झाला.

आता आसाम आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता जाहीर केला जात असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी असलेला जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्हा अव्वल ठरला आहे. या जिल्ह्यातील 5 लाख 45 हजार 280 शेतकरी 22 व्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख 92 हजार 441, कोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख 64 हजार 869, सातारा जिल्ह्यातील 4 लाख 38 हजार 668 आणि पुणे जिल्ह्यातील 4 लाख 33 हजार 706 शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी हा हप्ता आर्थिक आधार देणारा ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT