Uddhav Thackeray, Raj Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Raj-Uddhav Thackeray : ठाकरे ब्रॅंडला ग्रहण लागले का ?

Jagdish Pansare

MNS-Shivsena UBT Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे नावाचा ब्रॅंड गेल्या अनेक वर्षापासून नाव राखून आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेनेची सुत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती गेल्यानंतर राज ठाकरे यांनी पक्ष सोडला, स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला. ठाकरे ब्रॅंडला पहिला धक्का तेव्हा बसला, पण उद्धव आणि राज या दोन भावांनी आपापले पक्ष सांभाळत, वाढवत वाटचाल ठेवली आणि ठाकरे ब्रॅंडची व्हॅल्यू कमी होऊ दिली नाही.

प्रादेशिक पक्षांना भाजप गिळंकृत करायला निघाला असे आरोप जेव्हा जेव्हा झाले, तेव्हा राज्यात उद्धव आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या दोन भावांनी एकत्रित यावे, असा सूर विशेषतः मराठी माणसाच्या मनातून निघाला. पण हे प्रयत्न काही यशस्वी झाले नाही. राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्या, की अशा चर्चांना सुरवात होते. दोन वर्षापुर्वी शिवसेना पक्ष फुटला, उद्धव ठाकरे एकटे पडले तेव्हाही दोन भावांनी एकत्रित यावे, असे विचार पुढे आले. पण याचा विचार या दोघांकडून कधीच झाला नाही.

राज ठाकरे यांच्यावर कायम सत्ताधारी पक्षाकडून वापर केला गेला, ते सुपारी घेऊन काम करतात असे आरोप त्यांच्यावर केले गेले. लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देता पंतप्रधान पदावर मोदींना बसवण्यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेने बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर हे आरोप अधिक वाढले. मनसेने महायुतीला नुसता पाठिंबाच दिला नाही, तर महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही केला.

पण मराठा आरक्षणाच्या मुद्दा महायुतीवर असा काही उलटला? की भाजपचे मिशन 45 तर फेल झाले, पण गेल्यावेळी निवडून आलेल्या जागाही त्यांना राखता आल्या नाही. मित्रपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादीलाही याचा फटका बसला. या उलट महाविकास आघाडीची लाॅटरी लागली आणि यातील तीनही पक्षांनी मुसंडी मारली. पक्ष फुटल्यानंतर पहिल्याच लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नऊ खासदार निवडून आणत आपला ब्रॅंड अजून कायम असल्याचे दाखवून दिले.

तर दुसरीकडे राज ठाकरे यांचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय चुकला? अशी चर्चा होऊ लागली. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पुन्हा स्वबळाचा नारा देत राज्यातील सव्वा दोनशे जागा लढवण्याची तयारी सुरू केली. याची सुरवात त्यांनी मराठवाड्याचा दौरा आणि काही उमेदवार जाहीर करत केली. निवडणुका आल्या की राज ठाकरेंचे दौरे होतात, अशी टीका त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने झाली.

राज ठाकरेंना पहिल्यांदाच विरोध..

या आधी मराठा आरक्षण आंदोलनासाठी अंतरवालीत सुरू असलेल्या उपोषण स्थळी राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. आरक्षणावर त्यांनी आपली परखड भूमिका तिथे मांडली, त्यानंतर यावर त्यांनी फारसे भाष्य केले नव्हते. तेव्हा मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवला होता. मराठवाड्यातील दुसऱ्या दौऱ्यात राज ठाकरे यांना मराठा आरक्षणाच्या विषयावरून टोकाचा विरोध झाला.

धाराशिव दौऱ्यात ते थांबलेल्या हाॅटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले, त्यांनी घोषणाबाजी केली. यावर ठाकरे यांनी रुद्रावतार दाखवत त्यांना आधी घोषणा बंद करा, मग चर्चेला या अशा शब्दात खडसावले. त्यानंतर बराच गोंधळ आणि मग आंदोलक राज ठाकरे यांच्यात चर्चेने हे प्रकरण मिटले. पुढे या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करत कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपारी फेकत आंदोलन केले आणि प्रकरण चिघळले.

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात राज ठाकरे यांनी बीडमधील आंदोलनाचा संबंध पत्रकारांशी जोडला. शरद पवार, उद्धव ठाकरे यांना माझ्या नादाला लागू नका, असा सज्जड दम भरला. माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही, या राज ठाकरे यांच्या सूचक इशाऱ्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण, बांगड्या, टोमॅटो फेकून मनसेने पलटवार केला. कोल्हापूरात मनसेच्या पाटीची नासधूस झाल्याने आता एकाच नावाचे हे दोन ब्रॅंड राज्यात एकमेकांच्या विरोधात भिडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

राज ठाकरे यांचे मराठवाड्यात आतापर्यंत अनेक दौरे झाले. कामय त्यांचे इथे जल्लोषात स्वागत केले गेले. ठाकरे नावाला असलेले वलय, राज यांच्या पाठीशी तरुणांची असलेली शक्ती वारंवार दिसून आलेली आहे. पण केवळ निवडणुकीच्या काळात दौरे न करता राज ठाकरे यांनी मराठवाड्यात सातत्याने दौरे करावेत, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना व त्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात राहावे, अशी अपेक्षा बाळगली जाते.

मनसेच्या सामान्य कार्यकर्त्यांनाही हेच अपेक्षित आहे, पण ते बोलण्याचे धाडस ते दाखवत नाहीत. मराठवाडा दौऱ्यात धाराशीव, बीड मध्ये राज ठाकरे यांना विरोध, आंदोलन झाल्यानंतर संभाजीनगरात पोलिसांनी खबरदारी घेत बंदोबस्त वाढवला. राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद आणि जिल्ह्यातील नऊ मतदारसंघाचा आढावा घेत चार तासात दौरा आटोपला. शिवडी, पंढरपूर-मंगळवेढा, लातूर, हिंगोली या चार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून ठाकरे मुंबईत परतले.

सव्वा दोनशे विधानसभेच्या जागांपैकी ज्या मराठवाड्यात राज ठाकरे यांनी दौरा केला त्या भागात 48 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. पैकी राज ठाकरे यांनी फक्त दोन उमेदवार जाहीर केले. उर्वरित मतदारसंघात ते काय भूमिका घेतात? किती उमेदवार देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकूणच राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मराठवाड्यात राज ठाकरे यांना झालेला विरोध, आंदोलन पाहता ठाकरे ब्रॅंडला ग्रहण तर लागले नाही ना? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील कामगिरीवर ठाकरे ब्रॅंडची व्हॅल्यू ठरेल, तोपर्यंत वेट अॅन्ड वाॅच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT