imtiaz jaleel Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
महाराष्ट्र

Imtiaz Jaleel News : इम्तियाज जलील यांचे निवडणुक आयोगाला पत्र, ही केली मागणी..

Jagdish Pansare

AIMIM Political News Maharashtra : एमआयएमचे माजी खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुख्य निवडणुक आयोगाला पत्र पाठवून लोकसभेला संथगतीच्या प्रक्रियेमुळे मुस्लिम मताचा टक्का घसरल्याचे निदर्शनास आणून दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे. नुकत्याच झालेल्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा पराभव झाला. ते दुसऱ्या क्रमांकावर होते.

मतदानाच्या दिवशी मुस्लिम बहुल भागात मतदानाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याच्या असंख्य तक्रारी करण्यात आल्या होत्या. (AIMIM) मतदानाला वेळ लागत असल्याने ठिकठिकाणी रांगा लागल्या, उशीर लागत असल्याने अनेक मतदार हे मतदान न करताच निघून गेले, काहीजण घरातून बाहेरच निघाले नाही. या संदर्भात तेव्हा संबंधित यंत्रणांकडे तोंडी आणि लेखी तक्रारी करून काहीच उपयोग झाला नाही.

या सगळ्याचा परिणाम मुस्लिम मतांचा टक्का घसरण्यावर झाला. लोकसभेला झालेली चुक येणाऱ्या विधानसभेला होऊ नये यासाठी निवडणुक आयोगाने योग्य ती खबरदारी घेऊन, मतदान प्रक्रिया सुरळीत आणि वेगाने कशी पार पाडली जाईल? हे पहावे, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केले आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात अल्पसंख्यांक मुस्लिम बहुल भागातील बुथ वर अतिशय संथगतीने मतदान प्रक्रिया पार पाडली गेल्याने मतदानाचा टक्का घसरला होता.

त्याचीच पूनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये. याकरिता योग्य ती सकारात्मक कार्यवाही करुन मतदाराच्या तक्रारीचे निराकरण करण्याची मागणी इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी भारतीय निवडणुक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणुक आयुक्त यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना सुध्दा कळविले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत चौथा टप्प्यात 13 मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदार संघात मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. मतदानाच्या दिवशी अल्पसंख्यांक मुस्लिम बहुल भागातील बुथवर अतिशय संथगतीने मतदान होत असल्याची तक्रार वारंवार मतदार संबंधित अधिकारी यांच्याकडे करीत होते. याउलट मुस्लिम बहुल भाग वगळता इतर भागात मतदान प्रक्रिया व्यवस्थित व जलदगतीने पार पडली.

या संदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीचे निराकरण व्हावे, यासाठी मतदारांनी संबंधित अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा तोंडी तक्रारी केल्या होत्या. परंतु मतदानाची गती वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी व कोणताही अनुचित प्रकार घडु नये याकरिता अनेक मतदार बांधवांनी मतदान केलेच नाही. इतर मतदारांनी संयम ठेवुन भर उन्हात मतदानाचा हक्क बजावला. या कारणामुळे अल्पसंख्यांक मुस्लिम भागातील मतदानाचा टक्का घसरल्याचे आपल्या निदर्शनास येईल, असे पत्रात नमुद करण्यात आले आहे.

मतदानाची टक्केवारी वाढावी व सर्वसामान्य नागरीकांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रियतेने सहभावी व्हावे, यासाठी सर्व पातळीवर भारतीय निवडणूक आयोगाने `टर्निंग १८` आणि `यू आर द वन` या सारख्या अभियानांच्या माध्यमातून नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहित केले होते. `चुनाव का पर्व, देश का गर्व` या संकल्पनेच्या अंतर्गत अनुरूप संदेश धोरणाचा वापर सुरु केला होता. ऐकीकडे मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न तर दुसरीकडे प्रक्रिया संथगतीने असा विरोधाभास दिसतो आहे, असेही इम्तियाज जलील यांनी निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT