महायुतीने जागावाटपात रत्नागिरीतील राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला अपेक्षित जागा न दिल्याने नाराजी निर्माण झाली.
बंटी वणजू यांनी युतीने ‘तोंडाला पाने पुसल्याचा’ आरोप करत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले.
भविष्यात विचार न केल्यास रत्नागिरीत महायुती राहणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
Ratnagiri News : कोकणातील रायगड असो किंवा रत्नागिरी जिल्हा येथील महायुतीत उभी फूट पडली आहे. रायगडसह रत्नागिरीत भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. तर महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र दिसत आहेत. तर महायुती असो किंवा महाविकास आघाडी कोकणातून दोन्ही राष्ट्रवादींना बेदखल करण्यात आल्याचे येथे सध्या चित्र आहे. यामुळे रत्नागिरीत कोल्हापूर पॅटर्न राबवण्यात आला असून दोन्ही राष्ट्रवादीतील एक गट महायुती आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे. तर रत्नागिरीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बशीर मुर्तुझा यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षपदासह 12 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यांना कोणाच्या तरी सांगण्यावरून उभे करण्यात आल्याची चर्चा येथे सुरू झाली आहे. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅड. बंटी वणजू यांनी संताप व्यक्त केला असून विरोधकांना थेट इशाराच दिला आहे.
वणजू यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत मोठा आरोप केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) बशीर मुर्तुजा, राजन सुर्वे, बाप्पा सावंत, दया चवंडे आदी उपस्थित होते. यावेळी वणजू यांनी, महायुतीने पालिकेच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जिल्ह्यात जागावाटपावरून वाद सुरू झाला.
राजापूर वगळता महायुतीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तोंडाला पाने पुसल्याचा दावा त्यांनी केलाय. रत्नागिरीत दोन जागा देतो महायुतीच्या नेत्यांनी आम्हाला सांगितले होते. पण त्यांनी हा देखील शब्द पाळला नाही. दोनही जागा दिल्या नाहीत. त्यामुळेच आम्ही स्वाभिमानाने बाहेर पडून स्वतंत्र लढण्याचे धाडस दाखवले.
यानंतरही आमच्या बाबात अफवा पसरवण्यात आल्या. आम्हाला कोणीतरी उभं केलं आहे. कोणाच्या सांगण्यावरून आम्ही उभे राहिलो आहोत, असे सांगितले जात आहे. पण आम्ही कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणीतरी उभं केलं म्हणून लढत नाहीय. राज्यात महायुती असली तरी रत्नागिरीत नसल्यानेच आम्ही स्वाभिमानाने बाहेर पडून निवडणुकीच्या मैदानात आहोत. आम्ही भविष्यात आमचा विचार केलेला नाही, असा संताप वणजू यांनी व्यक्त केला आहे.
तसेच वणजू म्हणाले, महायुतीमध्ये आम्हाला रत्नागिरीत दोन जागा देण्याचे आश्वासन दिले होते. अखेरपर्यंत देतो, म्हणून सांगितले आणि ऐनवेळेला ते नाकारण्यात आले. यामुळेच आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यामुळेच रत्नागिरी शहराचा विकास झाला आहे. तत्कालीन नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांच्या माध्यमातून झाला. मात्र रत्नागिरीत एक अफवा पसरली आहे की, आम्हाला कोणीतरी उभे केले; परंतु हे साफ खोट आहे. नगराध्यक्षपदासाठी वहिदा मुर्तुजा या उमेदवार असून नऊ ठिकाणी आम्ही उमेदवार दिले आहेत.तेच ते नगरसेवकांचे चेहरे पाहण्यापेक्षा आम्ही नवीन चेहरे दिले असल्याचा दावाही वणजू यांनी केला आहे.
येथील पालिका निवडणुकीसाठी महायुतीत युतीसाठी चर्चा सुरू होती. तसेच जागावाटपाबाबतही नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. पण येथील महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्हीमध्ये फाटाफूट झाली. एकाच वेळी दोन्ही राष्ट्रवादींना विश्वासात न घेतल्याने वादाची ठिणगी पडल्याने दोन्ही गट एकत्र येत रत्नागिरीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचे निश्चित केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बशीर मुर्तुझा यांनी नगराध्यक्षपदासह 12 उमेदवारांसह अर्ज दाखल केले. यामुळे शहरातील राजकारण ढवळून निघाले होते.
दरम्यान येथे महाविकास आघाडीही जाहीर झाली. ज्यातून उद्धवसेनेचे उपनेते व माजी आमदार बाळ माने यांनी आपल्या सूनेसाठी नगराध्यक्षपदावर दावा सांगितला. त्याचवेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनीही आपल्या पत्नीला उमेदवारी मागितली. ज्यामुळे महाविकास आघाडीत वाद वाढला. मात्र बैठकीनंतर नगराध्यक्षपदाची उमेदवारी उद्धवसेनेला देण्यात आली. यामुळे बशीर मुर्तुझा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेससोबत (अजित पवार) युती केली.
उमेदवारी अर्जाची शेवटच्या दिवशी 17 रोजी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आणि शहरातील इतर पदाधिकाऱ्यांनी देखील कोणताही गाजावाजा न करता सरळ रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी आणि 12 नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे शहरात मोठी राजकीय उलथापालथ झाली.
FAQs :
Q1: बंटी वणजू महायुतीवर का नाराज आहेत?
उ: जागावाटपात राष्ट्रवादीला आश्वासन दिलेल्या जागा न दिल्याने ते नाराज झाले.
Q2: कोणत्या भागात जागावाटपाचा वाद सर्वात जास्त झाला?
उ: रत्नागिरी जिल्ह्यात, राजापूर वगळता बहुतेक ठिकाणी नाराजी व्यक्त झाली.
Q3: राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वतंत्र का लढत आहे?
उ: महायुतीने वचन दिलेल्या जागा न पाळल्याचा आरोप करून त्यांनी स्वबळाचा निर्णय घेतला.
Q4: बंटी वणजू यांनी कोणता इशारा दिला?
उ: भविष्यात राष्ट्रवादीचा विचार केला नाही तर रत्नागिरीत महायुती राहणार नाही, असा त्यांनी इशारा दिला.
Q5: हा वाद कोणत्या निवडणुकीसंदर्भात आहे?
उ: स्थानिक स्वराज्य संस्था (पालिका) निवडणुकांसाठीचा जागावाटप वाद आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.