Crime
Crime Sarkarnama
कोकण

Konkan News : सकाळी ज्याच्या विरोधात बातमी दिली, दुपारी त्याच्याच गाडीने पत्रकाराला उडविले

सरकारनामा ब्युरो

Journalist Attack : सकाळी ज्याच्या विरोधात बातमी येते, त्याच्याच गाडीची धडक बसून पत्रकाराचा मृत्यू होतो... ही कथा नसून राजापूर (रत्नागिरी) येथे घडलेली घटना आहे. हा ठरवून घडवून आणलेला घातपात असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य प्रमुख एस.एम देशमुख (S.M. Deshmukh) यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपीस अटक केली आहे. मात्र आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही मराठी पत्रकार परिषदेने केली आहे.

राजापूर (Rajapur) येथे सोमवारी (ता. ६) चारचाकी आणि दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीवरील पत्रकार शशिकांत वारीसे हे गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मंगळवारी (ता. ७) सकाळी मृत्यू झाला. (Konkan journalist died)

या प्रकरणी चारचाकी चालक पंढरीनाथ आंबेरकर (Pandharinath Amberkar) यांच्यावर राजापूर पोलीस (Rajapur Police) स्थानकात ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची दुसरी बाजू समोर आल्यानंतर अपघातात मृत झालेल्या शशिकांत वारीसे यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे.

दरम्यान सोमवारी सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे (Shashikant Warise) यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. "मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो" अशा आशयाची ती बातमी होती. बातमीचे कात्रणही वारीसे यांनी सकाळी ग्रुपवर टाकले होते. रिफायनरी (Refinery in Konkan) समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेल्या बॅनरबाबत ती बातमी होती.

यानंतर दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात वारीसे गंभीर जखमी झाले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोल्हापूर येथे हलविले होते. मात्र मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

वारीसे यांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपावरून वाहनचालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष होते. सकाळी जो पत्रकार विरोधातील बातमीची पोस्ट टाकतो त्याच्याच गाडीला दुचाकीची धडक बसून त्याचा यामध्ये मृत्यू होतो, हे प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

रत्नागिरी (Ratnagiri) येथील पत्रकारांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्व पत्रकारांनी आज सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली. मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही या प्रकाराचाी चौकशी करून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT