Jitendra Awhad, Eknath Shinde
Jitendra Awhad, Eknath Shinde sarkarnama
कोकण

आव्हाड यांचा मोठा संकल्प की ज्यामुळे एकनाथ शिंदेंना हायसे वाटणार!

सरकारनामा ब्युरो

ठाणे : ''यापुढे महविकास आघाडीतील घटक पक्षांवर कोणीही टीका करायची नाही, आपला प्रतिस्पर्धी भाजप असून त्याला ठाणे शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रात वाढून द्यायचा नाही. त्यासाठी सर्वांची महाविकास आघाडी गरजेची असून तिच्या माध्यमातून भाजपच्या प्रवृत्तीविरूद्ध लढणार आहेत,'' अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

ठाणे येथील महापालिका प्रभाग रचनेच्या मुद्यावरून आव्हाड यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले होते. तसेच माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली होती. सेना आणि राष्ट्रवादीत ठाण्यात कलगीतुरा रंगला होता. आता मात्र, आव्हाड यांनी एक पाऊल मागे येत महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर म्हणजेच पर्यायाने शिंदेंवर टीका करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

श्री. आव्हाड म्हणाले, ''ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत संपूर्ण जिल्ह्याचे राजकिय अवलोकन करण्यात आले. याम्ये एकमताने महाविकास आघाडीच व्हावी, अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली. यापुढे कोणीही महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर टीका करायची नाही. समोरून जरी कोणी बोलले तर त्याला प्रतिउत्तर द्यायचे नाही,'' असे ठरल्याचे श्री. आव्हाड यांनी सांगितले.

आपला प्रतिस्पर्धी भाजप असून या पक्षाला ठाणेशहरासह जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात वाढून द्यायचे नसेल तर महाविकास आघाडी गरजेची आहे, असे मत सर्वांनी व्यक्त केले आहे. राज्यपातळीवर एकमेकांना सहाय्य करून भाजपच्या प्रवृत्तीविरूद्ध आपण लढणार आहोत. ज्या पध्दतीने संजय राऊतांच्या बाजूने सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत. पवार साहेब वारंवार सगळ्या नेत्यांची बाजू घेत आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पक्षविरहित वातावरण निर्माण व्हायला हवे, अशी सर्वांची इच्छा आहे.

आगामी काळात एकापाठोपाठ एक अशा निवडणूका येणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोमिलन गरजेचे आहे. त्यामुळे महाविकास अघाडी सर्वाच्या दृष्टीने फायद्याची असणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नारायण राणेंच्या इशाऱ्यावर श्री. आव्हाड म्हणाले, संस्कारक्षम असलेल्या महाराष्ट्राचे राजकारण सह्याद्रीच्या कड्यावरून घरंगळत खाली येताना दिसत आहे. विरोधी पक्षातील एखादा नेता आजारी असेल तर त्याला हेलिकॉप्टरने गावातून उचलून हॉस्पिटलमध्ये नेणारे नेते या महाराष्ट्राने पाहिले आहेत.

कित्येक जणांना अमेरिकेला पाठवून त्यांचे ऑपरेशन करून त्यांना जीवंत ठेवण्याचे काम या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी केले आहे. कोणीही घरापर्यंत पोहोचले नाही, कोणीही मुलाबाळांना त्रास होईल असे वागले नाही. कारण या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. यशवंतराव चव्हाणांचे एक उदाहरण सांगताना श्री. आव्हाड म्हणाले, यशवंतराव चव्हाणांना दुसरे लग्न करा, असे सांगण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी त्या माणसाला घरी बोलवून दोष तिच्या नाही दोष माझ्यात असल्याचे सांगितले. हे या महाराष्ट्रात पहायला मिळाले.

आता पोर बाळ सुना सगळ्याबद्दल राजकारण केले जाते. अख्खे घर डिस्टर्ब करण्याचे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. सर्वसामान्यांना याचे काहीही देणं घेणं नसते. त्यांचा पायाभूत सुविधा व दैनंदिन प्रश्नांशी संबंध असतो. महागाई 'आ' वासून उभी आहे. हे सर्व सुरू असताना चायना दोनशे किलोमीटर आत घुसली असून भारताचा प्रांत गिळंकृत करत आहे. दुसरीकडे तिबेटच्या मार्गाने पाकिस्तानला जाणारा चायनाचा रस्ता बनतोय. श्रीलंकेत चायनाने पोर्ट बनवलंय. या सगळ्या गोष्टींकडे आपण कधीच लक्ष देत नाही, असेही त्यांनी नमुद केले.

ठाणे निवडणुकीत महाविकास आघाडीबाबत काय भूमिका राहणार याविषयी विचारले असता श्री. आव्हाड म्हणाले, ''आघाडीबाबतची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू होईल. त्यानंतर ती खाली येईल. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असून त्याची अंमलबजावणी करावी लागेल,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT