Bal Mane BJP Entry Buzz News : राज्यात १७ जागांच्या विधान परिषद निवडणुका होत असून मतदानाच्या आधीच कोकणासह ५ ठिकाणी महायुतीला मोठं यश मिळालं आहे. कोकणाच्या जागेवर राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे बिनविरोध झाले असून मविआचे उमेदवार आणि ठाकरेंचे नेते बाळ माने यांच्या माघारीमुळे हे झाले आहे. पण यामागे आता मोठी राजकीय खेळी दिसत असून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोर धरताना दिसत आहेत. याच चर्चा शिवसेनेची डोकेदुखी वाढतील अशी शक्यता असून रत्नागिरीत मंत्री सामंत यांच्या राजकीय वर्चस्वाला पर्याय भाजप देत असल्याचे बोलले जात आहे. तर यामागे मंत्री नितेश राणे यांचा हात असून त्यांचा हा राजकीय डाव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबच शिंदेंच्या शिवसेनेलाही धक्का देणारा असल्याची चर्चा आहे.
कोकण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत बाळ माने यांनी अचानक माघार घेतली. त्यांच्या या राजकीय भूमिकेनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केली. ज्यानंतर बाळ माने यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या. यातच मंत्री नितेश राणे यांच्याबरोबर हात उंचावून विजयाची हमी देणं आणि त्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्यांमुळे या चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे.
या सर्व घडामोडींमुळे कोकणच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून याला आता वेग देखील आला आहे. तर बाळ माने लवकरच भाजप प्रवेश करतील अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत. तर हा पक्षप्रवेश भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेला त्रास दायक ठरणारा आहे. तर हा धोका लक्षात घेवूनच भाजप देखील मंत्री सामंत यांच्याविरोत प्लॅन आखत आहे.
बाळ माने आणि उदय सामंत हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोध असून आजपर्यंत एकमेकांच्या विरोधातच दंड थोपाटले आहेत. आताही २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. तर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत थेट माघार घेत भाजपबरोबर जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेही ते आधी भाजपचेच होते. पण त्यानंतर सामंत यांच्यामुळेच ते ठाकरेंबरोबर गेले. त्यांना उपनेते पद देण्यात आले.
मात्र आता ते पुन्हा भाजपकडे सरकताना दिसत असून नितेश राणेंकडून त्यांना बळ दिले जात आहे. तर हा सर्व खटाटोप सामंत यांच्या राजकीय वर्चस्वाला पर्याय उभे करण्यासाठी आहे. मात्र या प्रवेशाला विरोध होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. नुकताच बाळ माने यांनी माघार घेतली आणि ते नितेश राणे यांच्या सोबत खासगी विमानातून रत्नागिरीत आल्याचे समोर आले. तर त्याच विमानाने ते मुंबईला रवाना जात असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत पक्ष प्रवेशावर खळबतं झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
लवकरच बाळ माने यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता असून तसे झाल्यास रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होतील. ठाकरेंच्या शिवसेनेची जिल्ह्यातील ताकद आणखी कमी करण्यासह भाजपकडून सामंताच्या राजकीय वाटचालीवर अंकुश ठेवले जाण्याची शक्यता आहे. यासाठी मुंबईतील भाजप नेतृत्वासह नितेश राणे यांनी स्वतः पुढाकार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान या संपूर्ण घडामोडीत आमदार भास्कर जाधव यांचे मौन मात्र वेगळीच चर्चा तयार करत असून या बंडखोरीची त्यांना कल्पना होती, अशी कुजबुज जिल्ह्यासह ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू झाली आहे. आता या फक्त चर्चा आणि तर्कवितर्क आहे की खरचं याच काही काळबेरं आहे हे आता त्यांच्या अधिकृत भूमिकेनंतरच स्पष्ट होणार आहे. तर ते कोणती भूमिका घेतात याकडे कोकणासह राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.