BJP- Balasaheb's Shiv Sena
BJP- Balasaheb's Shiv Sena Sarkarnama
कोकण

Gram Panchayat Election : सिंधुदुर्गात झाली; रत्नागिरीत सरपंचपदावरून बाळासाहेबांची शिवसेना-भाजपची युती अडली

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : शेजारच्या सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchyat Election) बाळासाहेबांची शिवसेना (shivsena) आणि भाजपची (BJP) युती झाली आहे. मात्र, रत्नागिरीत (Ratnagiri) अद्याप या दोन्ही पक्षाच्या युतीची प्रतीक्षा आहे. मात्र, सरपंचपदाच्या जागांवरून युतीचे घोडे अडले आहे. रत्नागिरी तालुक्यातील २९ पैकी सुमारे आठ सरपंचपदासाठी भाजपचे उमेदवार असा प्रस्ताव बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, भाजप अधिक जागांसााठी आग्रही असल्याची माहिती आहे. (Balasaheb's Shiv Sena-BJP alliance stalled over the sarpanch post in Ratnagiri)

दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीबाबत दोन दिवसांत शिक्कामोर्तब होणार आहे, असा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात काय निर्णय होणार, याकडे कोकणाचे लक्ष असणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करताना स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी दौऱ्‍यावेळी सांगितले होते. त्यानुसार भाजपकडून सुरवातीला स्वबळाचा नारा दिला गेला. परंतु बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून जिल्हाप्रमुख राहुल पंडित आणि तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांनी तत्काळ भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्याशी प्राथमिक चर्चा केली.

रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत युती करण्याबाबतचा प्रस्तावही ठेवला होता. त्यावर अंतिम निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाणार होता. मंत्री, सामंत हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते असल्यामुळे रत्नागिरीतील ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तालुक्यातील २९ पैकी किती ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करणार याबाबत तर्कवितर्क मांडले जात आहेत.

भाजपकडूनही गेल्या दोन दिवसांत युतीसाठी सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत. सुरवातीला भाजपने ९ ठिकाणी सरपंच निवड करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता, तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून आठ जागा भाजपला देण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी ठेवल्याची माहिती पुढे आली आहे. रत्नागिरीत भाजप-सेना युती निश्‍चित असल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. फक्त जागावाटपाचा फॉर्म्युला दोन दिवसांत ठरवला जाणार आहे.

सरपंचपदाबरोबरच सदस्यांच्या जागावाटपाचा निर्णय हा स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून घेतला जाईल. गावाचा विकास लक्षात घेऊन कोणताही गोंधळ होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न केला जात आहे. याबाबत मंत्री सामंत यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी, असे प्रयत्न सुरू झाले आहेत.

दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला शह देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार असून, विभागप्रमुखांवर जबाबदाऱ्‍या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल, अशी स्थिती रत्नागिरी तालुक्यात निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपबरोबर युती झाली आहे. गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत. स्थानिक ग्रामस्थांशी समन्वय राखूनच निर्णय घेतले जातील, असे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT