Kolhapur News : पंतप्रधान मोदी हे १० जून रोजी सर्वाधिक काळ लोकशाही पद्धतीने देश चालवणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले. यासह त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या ४,३९८ दिवसांच्या विक्रमालाही मागे टाकले. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर भाजपाच्या काही नेत्यांनी मोदींची तुलना थेट नेहरू यांच्याशी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रातील काही मंत्र्यांनी केलेले वक्तव्य आम्हाला अजिबात मान्य नसल्याचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी म्हटले होते.
तसेच “सध्या नेहरू आणि मोदी अशी अशी स्पर्धा लावली जात असल्याचे म्हणत भाजपच्या नेत्यांना फटकारले होते. तर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना नेहरू आणि मोदी यांच्यात कुठलीही स्पर्धा नाही. खरं तर केवळ हा रेकॉर्डचा भाग असल्याचं म्हणत या विषयावर पडदा टाकला होता. मात्र आता भाजपचे जेष्ठ नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी तुलना होऊच शकत नाही. मोदी त्यांच्या खुपच पुढे आहेत, असे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार यांनी, नेहरूंबाबत सध्या स्पर्धा लावली जात आहे, पण अशी तुलना होऊ शकत नाही. ते अनेक वर्ष प्रधानमंत्री होते. या देशाला इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचं काम नेहरूं केलं ते आपण विसरू शकत नाही. नेहरू हे नेहरू होते आणि त्यांच्याबरोबर कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, अशा शब्दांत नेहरूंची तुलना मोदींशी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला होता. ज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच स्पष्टीकरण देत मी कोणाशी तुलना करू इच्छित नाही. तुलना करण्याचं कारण नाही असे म्हटले होते. यानंतर हा वाद संपल्यात जमा झाला होता.
पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी तुलना होऊच शकत नाही. मोदी त्यांच्या खुपच पुढे आहेत, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावेळी पाटील म्हणाले, नेहरू स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आले आणि मोदी स्वातंत्र्यानंतर जन्माला आले, त्याला आपण काय करू शकतो? मात्र आता मोदींनी आणीबाणीत संघर्ष केला. स्वातंत्र्याआधी देशासाठी मेले पाहिजे हा नारा होता, आता देशासाठी चांगले जगले पाहिजे, असा नारा आहे. पंतप्रधान मोदींनी जगामध्ये देशाचे नाव वाढवले आहे. यामुळे नेहरूंची त्यांच्याशी तुलनाच होऊच शकत नाही.
यामुळेच शरद पवार यांनी गुगली टाकली आहे. त्यांनाही हेच म्हणायचे होतं की मोदी हे मोदी आहेत. त्यांच्याशी नेहरूंबरोबर तुलना कशी होईल? होऊच शकत नाही. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यांनी गोकुळच्या निवडणुकीवर देखील भाष्य केलं आहे. गोकुळची निवडणूकही महायुती म्हणून लढविणार असून, नेमके मतदार किती, याची यादी तयार झालेली नाही. आधी ठराव टेबलावर ठेवा, असे आमचे म्हणणे आहे. कोणाचे ठराव किती यावर जागा ठरतील, असेही संकेत त्यांनी दिले आहेत.
तसेच आमदार शिवाजी पाटील यांच्या नाराजीवर बोलताना, आमदार शिवाजी पाटील घरातील मुलगा आहे. त्यांना आई-वडिलांवर बोलण्याचा अधिकार आहे. आमची बैठक नियोजित नव्हती. त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी झालो आहोत. खरेतर ते मीडियाच्या जाळ्यात फसले, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.