Ajit Pawar Sarkarnama
कोकण

Ajit Pawar : अजितदादांच्या घोषणेने भाजपची गोची? म्हणाले, 'रायगडची जागा...'

सरकारनामा ब्यूरो

Raigad News : कोकणात रायगड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या धैर्यशील पाटील यांनाच उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी होत आहे. आज जिल्ह्यात म्हसळा येथे झालेल्या कार्यक्रमात अजितदादांनी रायगड लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी लढवेल, अशी मोठी घोषणा केली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी मिळणार असून तुमच्या मनातील उमेदवार दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनील तटकरे यांनाच तिकीट मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली असून आता भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

रायगड जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला असून तसे कार्यकर्ते मेळावे भाजपा घेत आहे. मात्र अजित पवार यांच्या संकेतामुळे जिल्ह्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद वाढणार काय असा प्रश्न पडला आहे. म्हसळा येथील 43 कोटी रुपये खर्चाच्या म्हसळा शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर पाटील उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील सर्व 48 जागा निवडण्याचा आणि त्या जिंकून आणण्याचा निश्चय केला असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे व तुमच्या मनातील उमेदवार इथे दिला जाणार असल्याचे म्हटले. काही दिवसांपूर्वीच पाली सुधागड येथे झालेल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात खासदार तटकरे यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी टीका केली होती व रायगडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दावा केला होता.

त्यानंतर रायगड मधील राजकीय परिस्थिती वेगळी असून खासदार तटकरे यांनीच लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे. रायगडच्या विकासाच्या दृष्टीने खासदार सुनिल तटकरे हेच लोकसभा उमेदवार पाहिजेत, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग येथे करत समर्थन केले होते. या पार्श्वभूमीवर महायुती मधील वरिष्ठ नेते रायगड लोकसभा मतदारसंघाबद्दल काय भूमिका घेतात याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांनी सांगितले की, शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शिव स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून खासदार तटकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या भूमीत राष्ट्रवादी पक्ष हा वाढवला असून त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते यांनी त्यांना भक्कम अशी साथ दिली. म्हणून आज रायगडमध्ये आपल्या पक्षाची नाळ ही गावागावात जोडली गेली असल्याचे पवार यांनी सांगत तटकरे यांच्या कामाचं कौतुक केले.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT