पाली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला.
भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत थेट लढत झाली, ज्यात भाजप विजयी झाला.
या निकालामुळे महायुतीमधील अंतर्गत राजकारणाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
Raigad News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जय्यत तयारी सध्या राजकीय पक्षांकडून सुरू आहे. तगड्या नेत्यांसह महत्वाच्या संस्था आपल्याकडे घेण्यासाठी प्रामुख्याने महायुतीतीतच रस्सी खेच होताना दिसत आहे. अशातच नुकताच झालेल्या अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीतील मित्र पक्षांमध्येच दोस्तीत कुस्ती पाहायला मिळाली. आधी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढेल अशी शक्यता असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माघार घेतली. या माघारीमुळे ऐन निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भापजला याचा फायदा झाला आणि नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता निवडून आले. यावेळी नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व ढोल ताशा वाजवत एकच जल्लोष केला. ज्याची आता कोकणात जोरदार चर्चा सुरू आहे.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी (दि.१०) पार पडली. यावेळी ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. भाजपकडून पराग मेहता, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कल्याणी दबके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र एक दिवस आधीच नाटकीय घडामोडी घडल्या. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी नगराध्यक्ष पदासाठी भरलेला अर्ज मागे घेतला. तसेच भाजपला पाठिंबा दिला. तसेच राष्ट्रवादीचे सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांनी देखील पक्षाच्या वतीने भाजपलाच पाठिंबा दिला. यामुळे ही निवडणूक दुरंगी झाली.
पाली नगरपंचायतीत एकूण 17 सदस्य असून 2 सदस्यांचे सदस्यत्व काही दिवसांपूर्वी रद्द झाले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) 5, शिवसेना (एकनाथ शिंदे) 5 नगरसेवक, भाजप 4 नगरसेवक आणि शेकाप 1 नगरसेवक अशी पक्षीय बलाबल आहे. तर 15 नगरसेवकांच्या मतांपैकी पराग मेहता यांना नऊ मते आणि कल्याणी दबके यांना पाच मते मिळाली. एक नगरसेवक तटस्थ राहिला.
काही दिवसांपूर्वी पाली नगरपंचायतमध्ये असंख्य राजकीय उलथापालथ होताना दिसल्या आहेत. तत्कालीन नगराध्यक्षा व नगरसेवक यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यामुळे नगराध्यक्ष पद रिक्त होते. त्यामुळे बुधवारी याची निवडणूक पार पडली. यामुळे अवघ्या साडेतीन वर्षांत चौथ्या नगराध्यक्षाची निवड झालीय.
या निवडणुकीच्या दरम्यान भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची आपल्या नगरसेवकांवर बारिक नजर ठेवण्यात आली होती. कोण कुठे जातो, काय करतोय याकडे पक्षश्रेष्ठी व पदाधिकारी, नेते यांचे लक्ष होते. शिवाय मतदानाच्या दिवशीही पक्षादेश पाळला जावा याकडेही प्रदेशाध्यक्ष खासदार खासदार सुनील तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे बारिक लक्ष होते.
सध्या राज्या पातळीवर महायुती असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकी महायुती म्हणूनच तिघी पक्षांनी लढली आहे. पण आता स्थानिकच्या पार्श्वभूमिवर तिघी पक्ष लढतील अशी शक्यता धुसर आहे. याची पहिली प्रचिती पाली नगरपंचायतीत दिसून आली असून महायुतीत एकी नसल्याचे दिसून आले आहे. येथे विरोधकांऐवजी महायुतीतच रस्सीखेच झाली असून भाजप व शिवसेना या दोघांत थेट लढत झाली आहे.
पाली नगरपंचायतमध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहाण्यास मिळाल्या. यावेळी निवडणुकीच्या एक दिवस आधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने काढता पाय घेतला. नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि भाजपचे पराग मेहता यांना पाठिंबा दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांनी देखील पक्षाच्या वतीने भाजपचे उमेदवार पराग मेहता यांना पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचे पारडे जड झाले. मात्र त्या दिवशी काही नगरसेवक नॉट रिचेबल असल्यामुळे नक्की कोणता चमत्कार घडेल, कोण नगराध्यक्ष होईल या चर्चांना उधाण आले होते.
प्र.१: पाली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोण विजयी झाले?
उ. भाजपचा उमेदवार नगराध्यक्ष पदावर विजयी झाला.
प्र.२: अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कोणाला पाठिंबा दिला?
उ. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला.
प्र.३: शिंदे गटाच्या शिवसेनेचा काय निकाल लागला?
उ. शिंदे गटाची शिवसेना पराभूत झाली.
प्र.४: ही निवडणूक महायुतीसाठी महत्त्वाची का ठरली?
उ. कारण भाजप आणि शिवसेनेत थेट लढत झाली, ज्यामुळे अंतर्गत तणाव समोर आला.
प्र.५: पाली कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे?
उ. पाली हे अष्टविनायक तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.