Devendra Fadanvis: पनवेल येथील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे सोमवारी (ता. १५) आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी संवाद घडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शाळेतील इयत्ता चौथीच्या एका चिमुरड्या विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्र्यांची घेतलेली मुलाखत होय.
विद्यार्थिनीने अत्यंत आत्मविश्वासाने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. तिने घेतलेल्या या मुलाखतीमध्ये शिक्षण, सामाजिक कार्य आणि डिजिटल युगातील बदल याविषयी विविध प्रश्न विचारले, ज्यांची मुख्यमंत्र्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने आणि कौतुकाने उत्तरे दिली.
मुलाखती दरम्यान आपल्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनाचा प्रवास उलगडताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांचा हा प्रवास एक सामान्य विद्यार्थी म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करताना सुरू झाला. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवता सोडवता ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले. समाजात कोणताही सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल तर संघर्ष हा अपरिहार्य असतो, मात्र चांगल्या उद्दिष्टासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यासोबतच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा व विचारांचा उल्लेख करून, नवीन पिढीने त्यांच्या जीवनप्रवासातून निरंतर प्रेरणा घेतली पाहिजे असे आवाहन केले.
या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये माजी खासदार रामशेठ ठाकूर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांसह इतर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता.
या कार्यक्रमादरम्यान शाळेतील आयडियल सेंटर लॅबचे उद्घाटन करण्यात आले, या आधुनिक डिजिटल लॅबमुळे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून अवघड विषय सोप्या पद्धतीने समजून घेता येतील. तसेच या ठिकाणी प्रश्नोत्तरे, ऑनलाईन शिक्षण आणि स्वमूल्यमापनाची आधुनिक सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण अधिक दर्जेदार आणि रंजक होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः या लॅबची पाहणी केली आणि संगणकावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने नव्याने शाळेत दाखल झालेल्या इयत्ता पहिलीच्या लहान मुलांचे औक्षण करून आणि त्यांना गुलाबपुष्प देऊन अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्गखोलीत जाऊन विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना या आधुनिक डिजिटल लॅबचा दररोज नियमित वापर करून आपले ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवण्याचा मोलाचा संदेश दिला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधता आल्यामुळे आणि आपल्याच वर्गातील मैत्रिणीने त्यांची घेतलेली मुलाखत पाहून वहाळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.