Devendra Fadnavis-Amit Shah Sarkarnama
कोकण

Shivaji Maharaj Statue in Arabian Sea : अरबी समुद्रातील ‘छत्रपतीं’च्या स्मारकाबाबत फडणवीसांची थेट रायगडाहून अमित शाहांच्या साक्षीने मोठी घोषणा! (Video)

Devendra Fadnavis Speech On Raigad : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरूनच लोटून दिलं पाहिजे. पण, आपण लोकशाहीमध्ये आहोत, लोकशाही अनुरूप नियम तयार करणाऱ्याचे काम केले जाईल.

Vijaykumar Dudhale

Raigad, 12 April : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील नियोजित स्मारकावरून विरोधी पक्षांकडून भाजपवर कायम टीकास्त्र सोडले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे 24 डिसेंबर 2016 रोजी पूजन करण्यात आले होते, त्यामुळे मोदींवरही निशाणा साधला जातो. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या साक्षीने ‘उच्च न्यायालयात आम्ही लढू आणि कोणत्याही परिस्थितीत स्मारक करू,’ अशी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्यावर आमची चर्चाही झाली आहे. त्यासंदर्भात योग्य कार्यवाही आम्ही करणार आहेात. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरूनच लोटून दिलं पाहिजे. पण, आपण लोकशाहीमध्ये आहोत, लोकशाही अनुरूप नियम तयार करणाऱ्याचे काम केले जाईल. त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास राज्य सरकारच्या वतीने तयार केला जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे अरबी समुद्रातील नियोजित स्मारक हे सर्वोच्च न्यायालयात अडकले होते. आता ते सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाकडे पाठविले आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, हार मानणार नाही. उच्च न्यायालयात लढून आम्ही तो स्मारक मोकळे करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झाले पाहिजे, असा आपला प्रयत्न असेल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले.

फडणवीस म्हणाले, दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे जाऊ. त्यांच्या मदतीने दिल्लीत योग्य त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तयार करण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनिस्कोच्या विश्वहेरिटेजमध्ये नामांकित केलेले आहे. ‘युनिस्को’च्या फ्रान्समध्ये १८ ते २१ एप्रिल दरम्यान होणाऱ्या बैठकीला मी आणि आशिष शेलार जाणार आहोत. त्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांबाबत आम्ही प्रेझेंटेशन करणार आहोत. मला विश्वास आहे की, महाराजांचे बारा किल्ले हे केवळ भारताचे किल्ले राहणार नसून विश्व वारसा म्हणून त्यांची गणना होईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने चालणारे सरकार आहे. आमच्या समोर केवळ छत्रपतींचाच आदर्श असतो. छत्रपतींचा आदर्श आणि संविधान या दोनच गोष्टींच्या आधारावर आमचं सरकार काम करेल, हा विश्वास देतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT