Sanjay Kadam join Shivsena
Sanjay Kadam join Shivsena Sarkarnama
कोकण

Konkan News : रत्नागिरीत भास्कर जाधवांच्या जोडीला ठाकरे गटाला मिळाला आक्रमक नेता

सरकारनामा ब्यूरो

सिद्धेश परशेट्ये

खेड : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेमुळे कोकणातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे ऐन शिमगोत्सवातच कोकणवासीयांना नेत्यांचा राजकीय शिमगा पाहायला मिळतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांना आपल्या संघटनेत प्रवेश देऊन उत्तर रत्नागिरीतील शिवसेनेच्या (Shivsena) मावळ्यांना बळ देण्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होणार हे मात्र येणारा काळच ठरवेल. (In Ratnagiri, along with Bhaskar Jadhav, Shiv Sena got aggressive leader Sanjay Kadam)

कोकणातील रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वर्षीच्या फुटीपूर्वी या जिल्ह्यात शिवसेनेचा बऱ्यापैकी प्रभाव होता. येथील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पालिका इत्यादींवर या पक्षाचं वर्चस्व होतं. शिवसेनेने वाड्या-वस्त्यांपर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं. छोट्या छोट्या शिवसेनेच्या शाखामधून सेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची स्थानिक पातळीवरील पकड घट्ट केली.

गेल्या वर्षी जून महिन्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार-खासदारांचा मोठा गट बाहेर पडला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या चार आमदारांपैकी विद्यमान पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम हे दोघेजण शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत.

माजी मंत्री आणि शिवसेनेचे आक्रमक नेते रामदास कदम यांच्यासह माजी आमदार सदानंद चव्हाण हे शिंदे गटात( शिवसेने) सामील झाल्यामुळे कोकणात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पाचही जागांवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेकडे सद्यःस्थितीत गुहागर आणि राजापूर हे दोन मतदारसंघ वगळता अन्य तीनही मतदारसंघात विरोधक ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे या विरोधकांना शह देताना एकाकी पडलेल्या शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून विरोधकांना चितपट करण्यासाठी माजी आमदार संजय कदम यांचा पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे.

जिल्हाच्या उत्तर भागात ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव वगळता ठाकरे गटाकडे सक्षम, अनुभवी नेतृत्व राहिलेलं नाही. अशा परिस्थितीत संघटनेची पुनर्बांधणी करत असताना कोकणच्या उत्तर भागात त्यांना शिवसेना शैलीतल्या आक्रमक नेत्याची गरज होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी संजय कदम यांचा प्रवेश झाला आहे.

माजी आमदार संजय कदम यांच्या प्रवेशामुळे उत्तर रत्नागिरीतील राजकीय समीकरणे बदलणार हे जरी गृहीत धरले तरी पुढे होणाऱ्या गतिमान राजकीय हालचाली देखील यासाठी फार महत्त्वाच्या ठरणार आहेत. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेने पदाधिकारी आणि कार्यकत्यांना प्रोत्साहन मिळाले असले तरी हीच परिस्थिती कायम राहण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांना पक्षाच्या नेतृत्वाने पक्ष बांधणीसाठी विशेष कार्यक्रम हाती देणे गरजेचे आहे.

आम्हाला फायदा होईल : ठाकरे गट

सभेच्या निमित्ताने संपूर्ण देशाला समजले की शिवसेना ठाकरेंची आहे. लोकांच्या मनातील संभ्रम दूर झाला असून, समस्त कोकणवासीय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत आहेत. या सभेचा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आमच्या पक्षाला फायदा होईल, असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खेड तालुकाप्रमुख संदीप कांबळे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या सभेचा परिणाम होणार नाही : शिंदे गट

या सभेचा कोणताही परिणाम शिवसेना पक्षावर होणार नाही. ही सभा इथे सुरु असताना दापोली तालुक्यात पक्षप्रवेश सुरु होते. अगदी काल देखील अनेक गावातील ग्रामस्थांनी रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला आहे. आमदार योगेश कदम यांचा विकासकामांचा धडाका सुरु असुन, या सभेमुळे आम्हाला विशेष फरक पडणार नाही, असे शिवसेनेच (शिंदे गट) खेड शहराध्यक्ष कुंदन सातपुते यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT