Raj Thackeray Sarkarnama
कोकण

Raj Thackeray : राज ठाकरेंनी शेकापच्या मेळाव्यात सांगितली मनातील खंत; ‘बाहेरचे लोक महाराष्ट्राबाबत काय बोलतात? ते ऐकून लाज वाटते’

Shetkari Kamgar Party Anniversary : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी रायगडमधील शेतजमिनीची होणारी विक्री, रायगडमध्ये वाढणारे डान्सबार आणि इतर गोष्टींवर भाष्य केले.

Vijaykumar Dudhale

Raigad, 02 August : बाहेरच्या राज्यात आपल्याबाबत (महाराष्ट्र आणि मराठी माणूस) काय बोलले जाते माहिती आहे का? ते एकून मला अत्यंत लाज वाटते, लाज. हे कोण आहेत लोक..तर परचेसेबल कम्युनिटी (म्हणजे विकत घेता येऊ शकणारी माणसं) असा उल्लेख ते महाराष्ट्रातील मराठी लोकांचा करतात. ही आपली प्रतिमा आहे का? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.

शेतकरी कामगार पक्षाच्या (PWP Party) वर्धापनदिन कार्यक्रमाचे पनवेल येथे आज (ता. 02 ऑगस्ट) आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे () यांनी पुन्हा एकदा मराठी माणसाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, रायगड जिल्ह्यात काय सुरू आहे, याकडे तरुण-तरुणींनी लक्ष ठेवले पाहिजे. तुम्ही विकले जात आहे. तुमच्या पायाखालची जमीन निसटते आहे, उद्या तुमची भाषाही निघून जाणार आहे. कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारून घेण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय असणार नाही. पैसे कमावले पाहिजेत, पण महाराष्ट्र विकून नाही.

बाहेरच्या राज्यात आपल्याबाबत काय बोलले जाते माहिती आहे का? ते ऐकून अत्यंत लाज वाटते लाज. हे कोण आहेत लोक....तर म्हणे परचेसेबल कम्युनिटी (म्हणजे विकत घेता येऊ शकणारी माणसं) असा उल्लेख ते महाराष्ट्रातील मराठी लोकांचा करतात. ही आपली प्रतिमा आहे का? या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे सत्ता गाजविणारा हा महाराष्ट्र आहे. तो विकला जातो? तो विकाऊ आहे? त्यातील माणसं विकली जातात? असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला.

ते म्हणाले, आपल्या जमिनी, भाषा आणि इतर सर्व गोष्टी आपण सोडून द्यायला तयार आहोत?, असा आपला महाराष्ट्र आहे का? कशासाठी हे शिवाजी महाराजांचे पुतळे ठेवायचे? डेकोरेशन म्हणून...? या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या आहेत का? पारसी शब्द महाराष्ठ्रात असू नये; म्हणून स्वतःचा शब्दकोश काढणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपण सर्वांनी मराठीत बोललं पाहिजे, असे सांगितले होते. त्या महाराष्ट्रात आपण आपली भाषा विसरतोय, जमिनी घालवतोय, आमचं सत्व, स्वाभिमान घालवतोय.

स्वाभिमान शून्य माणसं ही जिवंत प्रेतं असतात. तुम्ही जिवंत प्रेतासारखं असता कामा नये. देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे. त्याची दशा होता कामा नये. तुम्ही जीवंत असलं पाहिजे. तुम्ही मोठे झाले पाहिजेत. पण, महाराष्ट्र विकून तुम्ही मोठे होता कामा नये. इतरांच्या आहारी जाऊन जमिनी देऊन टाकायच्या. उद्योग येतात, बाहेरची लोकं येतात. तुम्ही नुसतं महाराष्ट्रात बोलत असता, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.

गुजरातमधून बिहारींना दोनदा हाकलून दिले...

गुजरातमधून बिहारींना एकदा नव्हे तर दोनदा हाकलून दिलं होतं. पहिल्या वेळी २० हजार लोकांना हाकलून दिले. अल्पेश ठाकोर यांनी हे आंदोलन केले होते, त्या आंदोलनानंतर त्याला भाजपत प्रवेश देऊन आमदार करण्यात आले. वीस हजार बिहारींना हाकलून देणाऱ्या माणसाचा गुजरातमध्ये सत्कार आणि सन्मान होतो आणि राज ठाकरे जेव्हा बोलतो, त्या वेळी तो संकुचित आणि देशद्रोही कसा असतो, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT