Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
कोकण

जयंत पाटलांनी सांगितले ईडी, इन्कम टॅक्सचे छापे पडण्याचे कारण...

सरकारनामा ब्यूरो

रायगड : निवडून आलेले आमदार फोडण्याचा भाजपकडून (bjp) प्रयत्न झाला. मात्र ते शक्य झाले नाही; म्हणून ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकल्या जात आहेत. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का? भाजपचे लोक काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? असा प्रश्न आता सामान्य लोकच विचारत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले. (Jayant Patel explained the reason for the ED, income tax raids)

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात आलेल्या प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आज (ता. ११ एप्रिल) उरण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, मावळ लोकसभा निवडणुकीत उरणमधून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली मते मिळाली. मोदी लाट असूनही पक्ष पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना लोकांनी पक्षाला एक चांगला निकाल दिला. प्रत्येक दिवशी काही चांगले करण्याची संधी मिळत असते. त्यामुळे निराश व्हायचं नाही. संघर्ष करावा लागतो, मात्र त्या संघर्षानंतर विजय आपलाच असतो. म्हणून खचून जाऊ नका. इथले लोक हळूहळू राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळत आहेत.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीचा काळ होता, तेव्हा अनेक नेते पक्ष सोडून जात होते. पक्ष टिकणार नाही, सुमारे १० ते १५ च आमदार निवडून येतील असे भाकित केले गेले होते. मात्र आपले नेते पवार साहेब पायाल भिंगरी लावून बाहेर पडले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून १०० आमदार निवडून आणले. चांद्यापासून बांद्यापर्यंत पवारांना मानणारे लोक महाराष्ट्रात आहेत. त्याच लोकांनी पवार साहेबांवर विश्वास टाकला आणि राज्यात परिवर्तन झाले, याचे स्मरणही जयंत पाटील यांनी या वेळी करून दिले.

आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत, आपण त्यांना साथ द्या. येथे बूथ कार्यकर्ते घडवा, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवा जेणेकरून तो माणूस कायमस्वरूपी राष्ट्रवादीशी जोडला जाईल, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. प्रशांत पाटील हेही अतिशय चांगले काम करत आहेत, मला खात्री आहे ते अधिक मेहनत घेऊन या भागात राष्ट्रवादीचा झेंडा रोवतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसने या भागाचा नेहमीच विचार केला आहे. दि. बा. पाटील यांनी एक मोठा लढा भूमिपुत्रांसाठी दिला आणि इथल्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम पवार यांनी केले. येत्या काळातही भूमिपुत्रांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस काम करेल, असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग पूर्ण करत हा दौरा आता रायगड येथे पोचला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून संघटनेला एक ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज रायगड येथे आली आहे. आम्ही या दौऱ्याची वाट पाहत होतो, सुरुवात रायगडातून झाली नसेल पण आम्ही सांगता दिमाखदार करू, असे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, रायगड जिल्हा पवारांच्या आवडीचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. चांगल्या आरोग्य सुविधा, चांगल्या नागरी सुविधा पुरवण्याचे काम आम्ही करत आहोत. मच्छीमार बांधवांसाठी उपक्रम राबवले जात आहेत. याच कामाच्या जोरावर पक्ष संघटना बळकट करण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहू.

या वेळी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, आमदार अनिकेत तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, भावना घाणेकर, सुदाम पाटील, महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंडे, कोकण विभागीय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष किरण शिखरे, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, युवती जिल्हाध्यक्ष सायली दळवी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT