Kirit Somayya
Kirit Somayya sarkarnama
कोकण

रश्मी ठाकरेंचे बंगले दाखवण्यासाठी किरीट सोमय्या उद्या कोर्लईत

सरकारनामा ब्युरो

अलिबाग : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावावर मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे १९ बंगले असल्याचा दावा केला. आता या ठिकाणी बंगले आहेत किंवा नाहीत यावरून सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे. हे बंगले प्रसारमाध्यमांना दाखवण्यासाठी सोमय्या शुक्रवारी (ता. १८) कोर्लई येथे येत आहेत.

बंगले असलेल्या जागांची पाहणी केल्यानंतर सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीत जातील. त्यानंतर या प्रकरणाचा तपास असलेल्या रेवदंडा पोलिस ठाण्याला भेट देतील. यानंतर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून झालेल्या कारवाईचा आढावा घेतील. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे मोजकेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते असतील.

तुम्हाला जर ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि दिसले नाहीत तर त्या किरीट सोमय्यांना जोड्याने मारा, असे विधान संजय राऊत यांनी केल्यानंतर काही दिवसांपासून बाजूला राहिलेल्या रश्मी ठाकरे यांच्या १९ बेकायदा बंगल्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. संजय राऊत यांच्या या विधानाला उत्तर देताना सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत कोर्लई ग्रामपंचायतीतील कागदपत्रांचा पुरावा दिला.

याला दुजोरा देताना भाजपचे दक्षिण रायगडप्रमुख ॲड. महेश मोहिते यांनी त्यांच्याकडे १९ बंगल्यांचे २०२१ पर्यंतचे असेसमेंट उतारे, बेकायदा बंगल्यांचा विषय ऐरणीवर आल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायतीकडे केलेल्या पत्रव्यवहारांचे पुरावे असल्याचा दावा केला आहे. हे बंगले अद्यापही कागदोपत्री अस्तित्वात असल्याचे किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे; तर त्याच वेळेला हे बंगले २०१४ मध्ये सदर जमिनीचा खरेदी व्यवहार होण्यापूर्वीच पाडण्यात आलेले होते.

त्यामुळे येथे हे बंगले अस्तित्वात नाहीत. त्यांचे असेसमेंट रद्द करण्यात आलेले आहे. याचा संबंध रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराशी नसल्याचे म्हणणे कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांचे आहे. यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचा माफीनामा मागितला नसल्याचे कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील मुरूड कोर्लई येथील रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांच्या नावे साडेनऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने करीत आलेले आहेत. रिपब्लिक इंडिया टीव्हीचे अर्नब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक केल्यानंतर कोर्लई जमीन खरेदी-विक्री व्यवहार किरीट सोमय्या यांनी उघड केला होता. सदर जमीन ही अन्वय नाईक यांच्या नावे होती.

त्यांच्याकडूनच ही जमीन रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांच्या नावावर करताना राजकीय दबावाचा वापर करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी अलिबाग येथे आंदोलनही केले होते.

रिसॉर्टसाठी जमिनीची खरेदी

अलिबाग-मुरूड मार्गावर रेवदंडा चेकपोस्टपासून साधारण २०० मीटरच्या अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजूला ही जमीन आहे. या जागेत नारळीची झाडे, गुरांचा गोठा, पंप शेड, विहीर, पाण्याच्या टाक्या, साठवण तलाव असल्याचे दिसून येत आहे. कोर्लई ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत मिसाळ यांच्या म्हणण्यानुसार अन्वय नाईक यांनी २००९ रोजी आमच्याकडे रिसॉर्ट बांधण्यासाठी परवानगी मागितली होती. २००९ रोजी कच्ची घरे बांधली; मात्र नंतर त्यांना रिसॉर्टची परवानगी मिळाली नाही. त्या जागेवर असलेली ११-१२ घरे होती ती तोडून तेथे झाडे लावली. झाडे लावल्यानंतर २०१४ ला त्यांनी ही जागा रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांना रीतसर विक्री केली. या मिळकतीची २०२१ पर्यंतची एक लाख ६१ हजार असलेली थकबाकी भरण्यासाठी सबंधितांना नोटीस देण्यात आल्यानंतर सदर थकबाकी भरण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT