SSC mass copying Sarkarnama
कोकण

SSC mass copying : कोकण पॅटर्नला तडा? दहावीच्या उत्तरपत्रिका थेट शिक्षकांनीच लिहिल्याचा संशय!

Shocking allegations mass copying Sindhudurg SSC exams raise serious questions over credibility uch-praised ‘Kokan Pattern’ : सिंधुदुर्गातील दहावीतील कथित सामुदायिक कॉपी प्रकरणाने कोकणातील गुणवत्तेपूर्ण शिक्षण पॅटर्नला धक्का पोहोचला असून, या धक्कादायक प्रकाराची शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली आहे.

Pradeep Pendhare

Sindhudurg SSC copy case : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असतानाच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात दहावी परीक्षेतील कथित सामुदायिक कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणात थेट शिक्षकांनीच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिल्याचा संशय व्यक्त होत असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात गुणवत्तेचा मानदंड मानल्या जाणाऱ्या ‘कोकण पॅटर्न’लाच या प्रकारामुळे तडा गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

माहितीनुसार, वैभववाडी तालुक्यातील एका दहावीच्या परीक्षा केंद्राच्या उत्तरपत्रिका तपासणीदरम्यान एका शिक्षकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. काही विद्यार्थ्यांच्या (Student) उत्तरपत्रिकांमधील अक्षरशैली, शब्दरचना, वाक्यांची मांडणी आणि लेखनशैली अक्षरशः एकसारखी असल्याचे त्यांना आढळले. सुरुवातीला योगायोग वाटणारा हा प्रकार पुढे अधिक गंभीर बनला. काही उत्तरपत्रिकांमधील हस्ताक्षर इतके मिळतेजुळते होते की, त्या एकाच व्यक्तीने लिहिल्या असाव्यात असा संशय निर्माण झाला.

या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित शिक्षकाने (Teachers) कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडे तक्रार दाखल केली. बोर्डाने प्राथमिक चौकशी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या चौकशीची जबाबदारी उपशिक्षणाधिकारी संजय माने यांच्याकडे सोपविण्यात आली असून संबंधित परीक्षा केंद्र, पर्यवेक्षक, शिक्षक आणि संशयित उत्तरपत्रिकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कॉपी नेमकी झाली तरी कशी?

या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शिक्षकांनी उत्तरपत्रिका लिहिल्याचा संशय नेमका कसा निर्माण झाला? परीक्षेची वेळ संपताच उत्तरपत्रिका तातडीने जमा करून बोर्डाकडे पाठवल्या जातात. अशा परिस्थितीत शिक्षकांनी उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी वेळ कधी मिळाला? परीक्षा सुरू असतानाच विद्यार्थ्यांच्या जागी शिक्षक उत्तरं लिहित होते का? या संपूर्ण प्रकारात केंद्रावरील इतर कर्मचारी किंवा पर्यवेक्षकांचा सहभाग होता का? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

‘कोकण पॅटर्न’ला धक्का

गेल्या अनेक वर्षांपासून दहावी-बारावीच्या निकालांमध्ये कोकण विभाग राज्यात अव्वल राहिला आहे. ‘कोकण पॅटर्न’ हा गुणवत्तेचा आदर्श मानला जात असताना आता समोर आलेल्या या कथित कॉपी प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT