Narayan rane Vinayak raut  sarkarnama
कोकण

lok sabha election 2024 Result : अचूक रणनिती अन् राणेंची सरशी !

सरकारनामा ब्यूरो

शिवप्रसाद देसाई

Narayan Rane News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. याच मतदारसंघातून दोनवेळा खासदार झालेल्या उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांचे आव्हान राणे यांच्यासमोर होते. शिवसेनेत पडलेली फूट एकनाथ शिंदे 40 पेक्षा अधिक आमदारांना घेऊन बाहेर पडत त्यांनी भाजपच्या मदतीने राज्यात स्थापन केलेली सत्ता या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले होते.

रत्नागिरीत असलेले संघटनात्मक बळ याच्या जोरावर लढणाऱ्या राऊत यांचे बळ भाजपच्या नियोजनबद्ध रणनीतीसमोर कमजोर पडले. शिवसेनेच्या बलस्थानांचा पुरेपुर अभ्यास करून भाजपने अर्थात पर्यायाने नारायण राणेंनी निवडणुकीचे अचुक डाव खेळत मतांचे आकडे आपल्या बाजूने फिरवले. रत्नागिरीत शिवसेनेला चांगली मते पडतील, अशी स्थिती होती. तर सिंधुदुर्गात भाजपची असलेली ताकद ओळखून भाजपने येथील मताधिक्य वाढविण्यासाठी मोठी ताकद लावली. यासाठी सर्व रणनितींचा प्रभावीपणे वापर करण्यात आला. हे करताना रत्नागिरीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचे मताधिक्य कमी कसे राहिल, यावर काम केले. यासर्व पार्श्वभूमीवर राणेंनी आपल्या पारंपरिक शत्रू असलेल्या ठाकरे शिवसेनेला राजकीय वर्चस्वात पुन्हा मात दिली.

देशपातळीवर होणाऱ्या प्रचाराचा विचार करता मोठ्या संख्येने अल्पसंख्यांक, दलित मते भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.कोकणात उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती मतात परिवर्तीत होण्याची शक्यता होती. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेला मिळणारे संभाव्य मताधिक्यसुद्धा भाजपच्या दृष्टीने डोकेदुखी होती.त्यामुळे आपला उमेदवार जाहीर करायला भाजपला उशिर झाला. विशेष म्हणजे महायुतीत सहभागी असलेल्या शिंदे शिवसेनेने देखील या जागेवर दावा केला होता.त्यामुळे त्यांना प्रचार प्रवाहात सक्रिय करण्याचे आव्हान भाजपसमोर होते. लोकसभेसाठी या मतदारसंघात कमळ चिन्ह घेऊन भाजप पहिल्यांदाच लढत होती. निवडणुकीत अचुक रणनीती वापरत या संघटनेचा नियोजनबद्ध वापर केल्याने भाजपचा विजय शिवसेनेला रोखता आला नाही.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत हे शिंदे शिवसेनेत आले. त्यामुळे सावंतवाडी आणि रत्नागिरी मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे बळ कमी झाले. या दोघांनी राणेंसाठी लावलेली ताकद भाजपला फायद्याची ठरली. ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत असलेल्या वैभव नाईक यांच्या कुडाळ मतदारसंघात राणेंचे संघटनात्मक बळ चांगले आहे. राणेंनी घडवलेले अनेक कार्यकर्ते या मतदारसंघात प्रभाव राखून आहेत. त्यांना पूर्ण ताकदीने सक्रिय करत भाजपने येथून मताधिक्य घेतले. कणकवली भाजपचा बालेकिल्ला असल्याने येथूनही त्यांनी मतांचा टक्का वाढवला. सिंधुदुर्गातून भाजपला मिळालेले मताधिक्य ठाकरे शिवसेनेच्या अपेक्षेपेक्षा जास्त ठरले.

रत्नागिरीतील तिन्ही मतदारसंघ शिवसेनेला मताधिक्य देतील,अशी शक्यता होती. विशेषतः राजापूर आणि चिपळूणमध्ये भाजपसाठी फारशी चांगली स्थिती नव्हती. या तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपने जास्तीत जास्त मते वाढवण्याची रणनिती आखली. त्यात यश आल्याने शिवसेनेचे राऊत रत्नागिरीतून त्यांना विजयासाठी अपेक्षित मतांपासून कोसो दूर फेकले गेले. भाजपची गेल्या काही काळात संघटनात्मक ताकद काही पटीने वाढली आहे. केंद्रात दीर्घकाळ सत्तेत असल्याने त्याचा प्रभाव कोकणातील मुळ भाजप संघटनेवर दिसला.

राणेंच्या रुपाने केंद्र आणि राज्यातील वजनदार नेतृत्त्वाला भाजपने रिंगणात उतरवले होते.‘मोदी फॅक्टर’बरोबरच राणेंचा वैयक्तिक प्रभाव या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला. या तुलनेत ठाकरे शिवसेनेकडे मात्र संघटनात्मक ताकद खूपच दुबळी ठरणारी होती. भाजपने विरोधकांच्या जमेच्या बाजू विचारात घेऊन या संघटनेचा अचुक आणि प्रभावी वापर केला. या सगळ्यातून भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्गात मोठा विजय मिळविला. नारायण राणेंनी स्वतः अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी लोकसभेच्या रिंगणात ते पहिल्यांदाच उतरले होते. त्यामुळे त्यांच्या आणि पर्यायाने त्यांच्या समर्थकांच्या आगामी राजकीय वाटचालीत यावेळेचा निकाल प्रभाव टाकणारा ठरणार आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT