Bhaskar Jadhav on fake baba Ashok Kharat scandal sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचा संताप अनावर! ‘कॅप्टन खरात’वरून मंत्र्यांची अडचण अन् धुलाई, अखेर मुख्यमंत्र्यांनाच उठावं लागलं

fake baba Ashok Kharat scandal : सध्या राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून भोंदूबाबा अशोक खरात याच्या व्हिडिओ आणि रुपाली चाकणकर यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.

Aslam Shanedivan

  1. विधानसभेत विरोधकांनी मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली.

  2. भास्कर जाधव यांनी मंत्र्यांवर थेट हल्ला चढवत त्यांची कोंडी केली.

  3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत सविस्तर निवेदन देण्याचे आश्वासन दिले.

Ratnagiri/Mumbai News : भोंदूबाबा अशोक खरात याचे कारनामे आणि त्याच्याबरोबर राज्यातील प्रमुख नेत्यांसह देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या SIT कडून खरातची कसून चौकशी केली जात असून खरातचे एकानंतर एक कारनामे समोर येत आहेत. यातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विरोधकांनी केलेल्या आरोपामुळे अध्यक्षपदावरून पाय उतार व्हावं लागलं आहे. यादरम्यान आरोपांच्या फैरी थांबण्याचे नाव घेत नसतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ हादरवून सोडले. त्यांनी कॅप्टन खरातच्या नादी लागलेल्या मंत्र्यांची लाज काढल्याने विधिमंडळात गोंधळ झाला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली आहे.

राज्यातील वातावरण सध्या भोंदूबाबा अशोक खरात यांचे एकानंतर एक कारनामे समोर येत असल्याने चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकारामुळे राज्यभरात खळबळ माजली असतानाच विरोधकांनी केलेल्या आरोपामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता आरोपांच्या फैरी थांबण्याचे नाव घेत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आता या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाचा खुलासा राज्य सरकारला करावा लागणार आहे. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत आले असल्याने येत्या काळात या प्रश्नावरून सरकारला घेरण्याची संधी विरोधकांच्या हाती आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी अशोक खरात प्रकरणात नेमण्यात आलेल्या SIT वरून भास्कर जाधव यांनी गौप्यस्फोट केला होता. त्यांनी याप्रकरणावरून निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं. केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे हे प्रकरण बाहेर आलं, अन्यथा हे प्रकरण सरकारने प्रकरण दाबलं असतं, असा गौप्यस्फोट केला होता. तसेच याप्रकरणी SIT कधी नेमली याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणीही केली होती.

फक्त रुपाली चाकणकर आणि राजकीय पुढारी आहेत असे नाही, यात उच्चपदस्थ अधिकारी देखील असून अशोक खरातची उठबस करण्यात ते गुंतले आहेत. केवळ चाकणकर यांचा राजीनामा घेऊन सरकारने या विषयावरील लक्ष दुसरीकडे वळवू नये, राजीनामा झाला म्हणजे प्रकरण संपलं असं समजू नये. सरकारमधले अनेक मंत्री आणि अधिकारी यात असल्याने हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही भास्कर जाधव यांनी म्हटले होते.

यानंतर आता भास्कर जाधव, अधिवेशनात याप्रकरणी बोलताना थेट मंत्र्यांची लाज काढली. ते म्हणाले, हा एक अत्यंत गंभीर प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा असून सरकारने भोंदूला अटक करून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या सभागृहाचा अधिकार आहे की नेमके सरकार काय करत आहे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, सरकारकडून उत्तर येणे अपेक्षित आहे.

याप्रकरणात सरकारचा कसा थेट संबंध असून याच्यामध्ये आयएएस, आयपीएस, पोलीस अधिकारी गुंतले आहेत. तर सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधीही आहेत. मी कुठल्या एका पक्षावर बोलत नसून सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री असल्याचेही भास्कर जाधव म्हणाले. तर यावेळी भास्कर जाधव यांनी, पावसाळी अधिवेशनात नाशिकमधील हॉटेलचा उल्लेख करत तेथे राज्यकर्त्यांनी मागचा पुढचा विचार न करता प्रकरणाला क्लीन चिट देत नाशिकमधलं प्रकरण कळायला एवढा उशीर का? असाही सवाल त्यांनी केला.

तर हे सरकार कोणत्याही विषयाच्या शेवटात जाण्याअगोदरच आपले मत मांडते. यामुळे सरकारकडूनच त्या चौकशीमध्ये अडथळा निर्माण केला जातोय. चौकशीची दिशा बदलली जातेय. एकीकडे आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचे. अंधश्रद्धा निर्मुलनाचे कायदे करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून घ्यायचे आणि दुसरीकडे लोकांना गोमूत्र पाजायचे आणि आता त्या बुवाचे मूत्र प्यायला जाता का? तुम्हाला लाजा वाटत नाही का? असे म्हणत भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला. तसेच ज्या छत्रपतींचे नाव घेता त्यांनी कधी अमावस्या बघितली नाही, पौर्णिमा कधी बघितली नाही, पितृपक्ष कधी बघितला नाही, कुडबुडे, ज्योतिषी बघितलं नाही. की कधी गंडेदोरे, अंगठ्या, खडे बघितले नाहीत. मग तुम्ही हे उद्योग कशाला करता? असेही भास्कर जाधवांनी मंत्र्यांना खडेबोल सुनावले.

यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, या प्रकरणात आपल्या पोलिसांनी कारवाई केली असून ती आत्ताच जरी झाली असली तरी याची तयारी आधीपासून सुरू होती. खरात याच्या अटकेच्या अगोदरच म्हणजे साधारणपणे दहा तारखेला दुसऱ्या जिल्ह्यात एका तक्रारीवरून आपली पोलिसांनी कारवाईची तयारी केली होती. आता याबाबत आपण मंगळवारी (ता.२४) सविस्तर निवेदन करणार आहोत. यात राजकारणाचा प्रश्न नाही. तसे कोणी करू नये, हा प्रश्न महिलांच्या डिग्निटीचा आहे. याचे सखोल निवेदन करेन असे म्हणत त्यांनी भास्कर जाधव यांना शांत केले.

FAQs :

1. विधानसभेत कोणता मुद्दा उपस्थित करण्यात आला?
विरोधकांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीका केली.

2. भास्कर जाधव यांनी काय केले?
त्यांनी मंत्र्यांवर थेट टीका करत त्यांना अडचणीत आणले.

3. कोणत्या नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला?
विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि भास्कर जाधव.

4. मुख्यमंत्री काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर निवेदन देण्याचे आश्वासन दिले.

5. पुढे काय होऊ शकते?
सरकारकडून या मुद्द्यावर सविस्तर माहिती दिली जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT