राज्यभर अर्जांच्या शेवटच्या दिवशी मोठ्या हालचाली झाल्या असून कोल्हापूर, जेजुरी आणि कळंब येथे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले.
रत्नागिरीत महायुती आणि MVA यांनी अजित पवार व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जागा न दिल्यामुळे दोन्ही गटांनी आघाड्यांपासून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
कोकणातही आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन नगराध्यक्षपदासह अन्य जागांवर संयुक्त लढत देण्याची शक्यता मोठी आहे.
Ratnagiri News : राज्यात एकीकडे नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली असतानाच आता नव्या राजकीय समिकरणांची नांदी पाहायला मिळत आहे. जे राजकीय पक्ष कधीच एकत्र येणार नाहीत, असे बोलले जात होते. तेच पक्ष आता गळ्यात गळे घालून स्थानिकच्या निवडणुकीला सामोरं जाताना दिसत आहे. शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांनी युती केल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा रंगल्या होत्या. ज्याची पुणे, धाराशिव आणि कोल्हापुरात चांगली सुरूवात झालीय. यापाठोपाठ आता अशीच युती कोकणात होण्याची शक्यता असून येथे तसे संकेतच राष्ट्रवादीच्या नेत्याने दिले आहेत. यामुळे येथेही तशी युती झाल्यास महायुतीच नाहीतर महाविकास आघाडीला ही जिल्ह्यात स्थानिकच्या निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत राज्यभर जोरदार राजकीय हालचाली झाल्या. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातही झालेल्या नव्या युतीमुळे खळबळ उडाली. चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. हे असाध्य कार्य राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यापाठोपाठ त्यांनी आपल्या होमग्राऊंडवर कट्टर राजकीय शत्रू असणार्या समरजितसिंह घाटगे यांना देखील सोबत घेत राज्यालाच जोरदार धक्का दिला. येथेही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या.
पुण्यातील जेजुरी नगरपरिषदेमध्येही दोन्ही पवार एकत्र येऊन लढण्याची शक्यता निर्माण झाली. दोन्ही बाजूने चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असतानाच धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची माहिती मिळत आहे. येथे जागा वाटपाचा फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला ठरला असून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर अध्यक्ष पदाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरला आहे.
एकीकडे राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच आता कोकणातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे रत्नागिरीत महाविकास आघाडी असो किंवा महायुती यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला स्थान दिले नाही. जागा वाटपासह नगराध्यक्षा पदासाठी देखील दोन्ही राष्ट्रवादींना विचारात घेण्यात आलेलं नाही. यामुळेच युती आणि आघाडीतून दोन्ही राष्ट्रवादींनी फारकत घेतली असून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर आता एकत्र येऊन नगराध्यक्षपदासह अन्य जागा लढणार बोलले जात आहे.
दरम्यान रत्नागिरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे त्रांगडे झाले असून येथे एक गट थेट बाहेर पडला आहे. बशीर मुर्तुजा यांच्या नेतृत्वातील हा गट आता फुटला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांच्यावर त्यांनी खापर फोडले आहे. माने हे पक्षातील काही ठराविक पदाधिकाऱ्यांना घेऊन वेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहेत. यामध्ये महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस यांना कुठेही सामावून घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळेच बशीर मुर्तुझा यांनी थेट महाविकास आघाडीशी फारकत घेतली आहे. तर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुर्तुजा यांनी नगराध्यक्षपदासाठी आपल्या पत्नीला रिंगणात उतरवले असून नगरसेवकांच्या 10 एक जागांवर उमेदवार दिले आहेत. तर मुर्तुजा हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बंटी वणजूंसह युती करणार असल्याचे येथे चर्चा आहे. महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला न्याय न दिल्याने बंटी वणजू यांनी वेगळी चूल मांडली आहे. ज्याला आता मुर्तुजा यांची साथ देतील अशी शक्यता आहे.
एकंदर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून आणि वारंवार डावलल्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादींनी महायुती आणि महाविकास आघाडीतील बाहेर पडत एकत्र येण्याची रणनीती आखली असून रत्नागिरीतील राजकारणात पुढे काय होणार आता हे पाहावं लागणार आहे. यावेळी बशीर मुर्तुजा यांनी विधानसभा निवडणुकीला आम्ही बाळ मानेंच्या पाठीशी ठाम उभे होतो.
त्यामुळे आता पालिकेच्या निवडणुकीला आम्हाला उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. परंतु आमच्यातील काही लोक विकले गेल्यामुळे आम्ही उमेदवारी मिळवण्यास कमी पडलो. आता गटबाजीला आम्ही कंटाळलो आहोत. त्यामुळे यातून बाहेर पडत आहोत. आम्ही अजित पवार गटाबरोबर युती करून नगराध्यक्षपदासह स्वतंत्र उमेदवार देऊन मैदानात उतरल्याची घोषणाच त्यांनी केली आहे.
FAQs :
कोल्हापूरच्या चंदगड–कागल, पुण्यातील जेजुरी आणि कळंब नगर परिषद क्षेत्रात दोन्ही गट एकत्र आले आहेत.
कारण रत्नागिरीत महायुती आणि MVA यांनी दोन्ही राष्ट्रवादी गटांना जागा दिल्या नाहीत.
नगराध्यक्षपदासह महत्त्वाच्या नगरसेवक जागांवर संयुक्त उमेदवारी देण्याची चर्चा आहे.
अंतर्गत शक्तिसंतुलन, स्थानिक समीकरणे आणि आघाड्यांतील तिढा यामुळे त्यांना प्राधान्य मिळाले नाही.
तिसरा मोठा पर्याय तयार होऊ शकतो आणि स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.