Bhaskar Jadhav  Sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav : माझ्या वाट्याला अनेक अडचणी...सध्या भीतीही वाटू लागलीय : भास्कर जाधव असं का म्हणाले?

Vijaykumar Dudhale

Ratnagiri, 08 September : शिवसेना आमदार भास्कर जाधव हे परिणामाची भीती न बाळगता कोणालाही अंगावर घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, भास्कर जाधव यांनी एक खंत बोलून दाखवली आहे. सातत्याने माझ्या वाट्याला अनेक अडचणी येत आहेत. पूर्वी कसलीही भीती वाटत नव्हती. मात्र, 2014 नंतरचे भाजपचे राजकारण पाहून आता जरा भीती वाटू लागली आहे, अशी चिंता आमदार जाधव यांनी बोलून दाखवली.

माझ्या वाट्याला अनेक अडचणी सातत्याने येत आहेत. खोटेनाटे आरोप केले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात विरोधक तयार झाले आहेत. पण मी माझे तत्व कधीही सोडले नाही. स्पष्टवक्तेपणा सोडला नाही. खोट बोलायचं नाही आणि खोटं कधीही सहन करायचं नाही. दिलेला शब्द पाळायचं, यातून मी राजकारणात यशस्वी झालो, असे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सांगितले.

विरोधकांचेही चांगले विचार मी ऐकतो. हे करताना आपलं मूळ सोडायचं नाही. मी सर्व सण चिपळूणात (Chiplun) नाही तर माझ्या मूळगावी साजरे करतो. माझे सर्व कुटुंब एकत्र ठेवण्यात मी आजपर्यंत यशस्वी झालो आहे. त्यासाठी कष्ट तर सर्वांना करावे लागतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार जाधव म्हणाले, लोकांचे विचार बदलत चालले आहेत. लोक विचारांने विचाराचा सामना करायला तयार नाहीत. टीका खोडून काढण्यासाठी पुराव्यानिशी बोलायला तयार नाहीत. आपलं काम सांगायला लोक तयार नाहीत.

आपण कोणावरही कशीही टीका केली तर ती दुसऱ्यांनी सहन करावी, ऐकावी. पण, आपल्याला कोणी प्रत्युतर देऊ नये. कोणी प्रत्युत्तर दिलं तर त्याचा सामना विचाराने करावा, ही प्रवृत्ती लोप पावत चालली आहे. त्यामुळे राजकारण्यांवर वैयक्तिक हल्ले राजकारण्यांवर प्रचंड प्रमाणात वाढत चालले आहेत.

मी निर्भिडपणे बोलतो, स्पष्टवक्ता आहे. मला कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही. सत्याची कास सोडायची नाही, या विचाराचा मी आहे. पण, देशात आणि राज्यात २०१४ पासून भाजपचे राजकारण आलेले आहे, त्या राजकारणाचा एकंदरीत स्तर बघता, भाजपच्या लोकांची कार्यपद्धपती आणि सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग, पोलिसांना हाताशी धरून विरोधकांना संपवण्याची नीती महाराष्ट्रात आणली जात आहे.

त्यामुळे वाढतं वय, वाढतं कुटुंब आणि नातवंडापर्यंतच्या जबाबदाऱ्या बघता थोडीशी भीती नाही तर म्हटलं तरी यायला लागली आहे, ही गोष्ट खरी आहे, अशी कबुलीही भास्कर जाधव यांनी दिली.

ते म्हणाले, पूर्वी ही भीती अजिबात वाटत नव्हती. आताही भीती नाही; पण मनात विचार यायला लागला आहे की, त्यांच्या दृष्ट प्रवृत्ती कुठंपर्यत पोहोचू शकतील, अशी मनात थोडीशी भीती सध्या यायला लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT