Manoj Jarange Patil sarkarnama
कोकण

Maratha Reservation : आरक्षण न मिळाल्यास या नेत्यांना त्यांची जागा दाखवू, जरांगे पाटलांनी ठणकावलं

Anand Surwase

Maratha Reservation in Maharashtra : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ओबीसी समाजातूनही विरोध केला जात नाही. मात्र, एकच म्हातारा सध्या आरक्षणाला विरोध करत आहे, अशा शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री भुजबळ यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. रविवारी मनोज जरांगे यांची रायगड जिल्ह्यातील महाड येथे सभा पार पडली. या वेळी जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू केला आहे. या टप्प्यात रविवारी पाटील यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावर जात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. दरम्यान, मराठा समाजावर टीका करणाऱ्या नेत्यांवर बोलताना जरांगे म्हणाले की, मराठा समाज हक्काचे आरक्षण मागत आहे. तसेच मराठा समाज एकत्र येत नाही. खेकड्यासारखे पाय ओढतो, अशी टीका करणाऱ्यांना आता मराठा समाजाची एकी बघवली जात नसल्यानेच अशी वक्तव्ये केली जात असल्याची टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"एकच म्हातारं जास्त विरोध करतंय"

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार हे निश्चित झाले आहे. मात्र, याला विरोध करण्यासाठी मराठा आणि ओबीसी समाजबांधवामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दंगली घडवण्याच्या हेतून आक्रमक वक्तव्ये केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात ओबीसी समाजाचा आरक्षण देण्यास विरोध नाही. एकच म्हातारं मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून असली पातळी सोडून विरोध करत असल्याची टीका मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली. तसेच भुजबळांचे आता वय झाले आहे, त्यामुळे ते अशी बेताल वक्तव्य करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

"आता ही शेवटची लढाई"

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण असल्याच्या नोंदी सापडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आम्ही सरसकट मराठा समाजाला कुणबीच्या आधारावर आरक्षण देण्याची मागणी केली आहे. येत्या २४ डिसेंबरला मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. आता आम्ही शेवटची आणि निर्णायक लढाई लढत आहोत. वर्षानुवर्षे आंदोलने करायला आता आमचा तेवढा संयम उरला नाही. त्यामुळे आरक्षण न मिळाल्यास या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशाराही जरांगे पाटील यांनी या वेळी दिला.

"मराठा समाजाने एकजूट राहावे"

मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे येथून पुढे मराठा समाजाने एकजूट राहावे, असे आवाहान जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले. आता आपण एक आलो आहोत म्हणून ही लढाई इथंपर्यंत आली आहे. मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. मात्र, समाजाने आता आरक्षण मिळेपर्यंत राजकारणी लोकांच्या मागे न जाता आपल्या मुलांना आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र राहावे, कोणता गट तट, पक्ष हे सर्व बाजूला ठेवा आणि मराठा म्हणून एकजुटीने लढा आपल्याला आरक्षण मिळणार, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

"मागासवर्ग आयोगाकडून विलंब"

मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणासाठी वेळ दिलेली आहे. मात्र, मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी इतका वेळ अपुरा आहे. कोणी आंदोलनस्थळावरून तारीख दिली म्हणून लगेच आरक्षण देता येईल असे होत नसल्याची प्रतिक्रिया मागासवर्ग आयोगाने दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT