Maratha OBC Reservation : भुजबळांची भाषा चिथावणारी, अंधारेंचा गंभीर आरोप; जरांगे पाटलांनाही फटकारलं

Maratha OBC Reservation Sushma Andhare to Chhagan Bhujbal and Manoj jarange Patil : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मराठा, ओबीसी आरक्षणाच्या वादावरून मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे बघूया...
Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil, Sushma Andhare
Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil, Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation in Maharashtra : काल परवापर्यंत आपण भाजपवर एवढी जहरी टीका करत असताना आता भाजपशी हात मिळवणी का केली, हा प्रश्न मी आपल्याला अजिबात विचारणार नाही. कारण चित्रपटातली चित्रं, नाटकातली पात्रं आणि राजकारणातले मित्र कधीच खरे नसतात हे वाक्य मला ज्ञात आहे. त्यामुळे राजकारणात कुणीही कुणासाठीही सदा सर्वकाळ स्पृश्य किंवा अस्पृश्य असू शकत नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी छगन भुजबळांना टोला लगावला. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियाद्वारे मंत्री छगन भुजबळांना पत्र लिहिलं आहे.

बीडमधील जाळपोळ हिंसाचार हा पूर्वनियोजितच होता. हे बीडमधील रहिवासी आणि ही घटना बघणारे प्रत्यक्षदर्शी ही सांगतात. घरांना नंबर देण्यात आले होते. दंगलखोर पेट्रोल बॉम्ब, वॉकी टॉकी घेऊन मास्क लावून आले होते. हेही वर्णन खरे आहे. आणि त्या हिंसाचाराचे समर्थन कोणीही करू शकत नाही. काही पोलिस नक्कीच जायबंदीही झालेत.

मराठा समुदायाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र, ते ओबीसी प्रवर्गातून शक्य नाही. हे घटनेतील प्रकरण तीन कलम 16 ज्याने अभ्यासले आणि ज्याने कालेलकर आयोग, मंडल आयोग ते आजवरचे असे अनेक मागासवर्गासाठीचे आयोग अभ्यासले असतील, त्याला त्यातली मेख कळेल, असे त्या म्हणाल्या.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil, Sushma Andhare
Manoj Jarange : म्हातारा माणूस आहे, म्हणून मी काही बोलत नाही, पण..; जरांगेंचा भुजबळांना इशारा

सुषमा अंधारेंचे भुजबळांना सवाल

> बीडची जाळपोळ घडवणारे ते मराठा आंदोलकच होते हे कशावरून? जाणीवपूर्वक मराठा आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी दुसऱ्याच कुणीतरी हात धुऊन घेतला नसेल कशावरून, जसे भीमा कोरेगाव प्रकरणात झाले...!!

> मनोज जरांगे यांच्या पहिल्या उपोषणानंतर झालेला लाठीमार, गोळीबार किंवा दुसऱ्यांदा बीडमध्ये झालेली जाळपोळ याला जरांगे जबाबदार आहेत, असे सांगताना फडणवीस गृहमंत्री म्हणून पुरते अपयशी ठरले हे का सांगितले नाही.

> जरांगे पाचवी पास आहे असे आपण म्हणालात. कदाचित ते खरेही असेल, पण ते पाचवी पास आहेत आणि म्हणून त्यांना या आरक्षण प्रश्नातल्या खाचा खोचा समजत नसतील तर तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेले आहात. तुम्ही समजावून सांगाव्यात.

> कालच्या सभेत तुम्ही आरक्षणाचा प्रश्न हा राज्याशी संबंधित नाही, तर तो केंद्र सरकारशी संबंधित आहे. कारण मूलभूत हक्काशी संबंधित कलमांमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार कलम 368 (क) नुसार फक्त आणि फक्त केंद्र सरकारला आहे हे सांगणे गरजेचे होते.

पण या उलट आपण वैयक्तिक पातळीवर घसरलात असे वाटत नाही का ? "माझ्या शेपटीवर पाय देऊ नको" किंवा " याच्या जिवावर खातो त्याच्या जिवावर खातो." ही भाषा आपल्याकडून अजिबात अपेक्षित नाही. यामुळे आपण ओबीसींच्या बाजूने ओबीसींचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी नाही तर व्यक्तिगत टीकाटिप्पणी करून चिथावणी देत आहात असे वाटले, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुषमा अंधारेंचा मनोज जरांगेंनाही सवाल

जारांगे यांच्या उपोषणानेही काय साध्य झाले? ना ठोस आरक्षण मिळाले ना आरक्षण मार्गातील अडचणी नीट गावखेड्यांपर्यंत पोचल्या. उलट पाच पंचवीस लोकांचें जीव गेले अन् 7-800 लोकांवर गुन्हे दाखल झाले; मग 100- 100 जेसीबीमधून फुलांची उधळण आणि आर्थिक मागासलेपण म्हणून आरक्षण हा विरोधाभास आहे हे नेता म्हणून जरांगे यांनी समजून सांगायला हवे. मनोज जरांगे यांनी आपल्याला आव्हान द्यायचे किंवा आपण जरांगेंना प्रतिआव्हान द्यायचे यामध्ये मराठा किंवा ओबीसी यांचे कोणते हीत लपले आहे? असा परखड सवाल अंधारे यांनी केला आहे.

मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद चिघळत ठेवून कोणाचे भले होणार आहे? आर्थिकदृष्ट्या दुबळे असणाऱ्या या सगळ्या जातींनी आपापसात भांडत राहून तरण्याबांड पोरांवर गुन्हे दाखल करून घेत गाव शहर समाज किती दिवस पेटत ठेवायचा? कालच्या भाषणामध्ये तुम्ही या राज्याचा काही काळ उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणारे नेते तथा मनोज जरांगे यांच्यापेक्षा जास्त शिकलेले बुद्धिजीवी म्हणून आरक्षणाचा सवाल थेट केंद्रात बसलेल्या भाजप सरकारला का विचारला नाही?, असाही प्रश्न अंधारे यांनी केला.

आरक्षणाचा मुद्दा बाजूला करत दोन्हीकडून (भुजबळ आणि जरांगे ) जी वैयक्तिक पातळीवरची चिखल फेक होत आहे. यामुळे ना आरक्षणाचा प्रश्न सुटेल ना निर्दोष तरुणांवर दाखल झालेले गुन्हे निघतील, पण यामुळे भाजपचा फायदा नक्की होईल. मराठा समाजाची भीती दाखवत सगळ्या ओबीसींना एकत्रित करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपच्या प्रयत्नांना आपल्यामुळे बळ मिळेल, असं त्या पुढे म्हणाल्या.

दुर्बल आणि गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळायला हवे, असे तुम्हालाही वाटते ना? आणि त्याच वेळेला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असेही वाटते ना? तर चला मग ही भूमिका आपण शांतपणे जरांगे यांनाही समजावून सांगू आणि हा संपूर्ण आरक्षण तिढा सोडवण्याची क्षमता आणि अधिकार ज्या केंद्र सरकारकडे आहेत. त्या केंद्रातल्या भाजपला प्रश्न विचारू, असं आवाहन सुषमा अंधारे यांनी छगन भुजबळांना केलं आहे.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil, Sushma Andhare
Maratha Reservation : शंभूराज देसाईंनी सांगितली मराठा आरक्षणाची न्यायालयीन स्ट्रॅटेजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com