Vaibhav Naik
Vaibhav Naik Sarkarnama
कोकण

‘राणे ९० च्या दशकात काय करत होते...कुणाच्या हत्येच्या सुपाऱ्या दिल्या, हे सर्वांना माहिती आहे’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) स्वतःच सांगितलं की, मला पुन्हा पूर्वीसारखा राणे होऊ देऊ नका. नव्वदच्या दशकात राणे काय करत होते, हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. राणेंनी कुणाच्या हत्याच्या सुपाऱ्या दिल्या. त्यांच्यावर न्यायालयात हत्येच्या कटाचे किती दोषारोपपत्र आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केंद्रीय मंत्री राणेंच्या आरोपांना उत्तर दिले. तसेच, ‘राणे हे केंद्रीय मंत्री आहेत की शिंदे गटाचे प्रवक्ते’ असा सवालही नाईक यांनी केला. (MLA Vaibhav Naik's reply to Narayan Rane's allegation)

मला मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी छोट्या शकीलला सुपारी दिली होती, असा आरोप नारायण राणेंनी काल पत्रकार परिषद घेत केला होता. त्याला आमदार नाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार नाईक म्हणाले की, नव्वदच्या दशकात राणे काय करत होते, हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. अशी लोकं आपण चर्चेत आले पाहिजे म्हणून अशा प्रकारची विधाने करत असतात. त्यांच्या विधानाला काही अर्थ नाही आणि त्यांच्या राजकीय भविष्याला महाराष्ट्रात थारा नाही.

नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत की शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा कसा चांगला आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणे, यावर वेळ घालविला. केंद्रीय मंत्री म्हणून सरकारच्या योजनांबाबत बोलणे अपेक्षित आहे. वेदांता प्रकल्पाबाबत ते कधी बोलले नाहीत. पण ठाकरे यांच्यावर कायम बोलतात. पण राणेंच्या आरोपांना त्याच पद्धतीने शिवसेनेकडून उत्तर देण्यात येईल, असा इशाराही नाईक यांनी दिला.

रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) वर्ष-दोन वर्षभरापूर्वी तक्रार दाखल झाली हेाती. त्यानुसार एसीबीने मला नोटीस दिली असून रत्नागिरीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. काही कागदपत्रेही त्यांनी मागितली आहेत, ती मी लवकरच देणार आहे. याबाबतच्या चौकशीला मी संपूर्ण सहकार्य करणार आहे. पण, या चौकशी राजकीय दबावातून होत असल्याचे आता दिसू लागले आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

आमदार नाईक म्हणाले की, आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि लोकांबरोबर राहिलो आहोत. आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही, त्यामुळे आमच्या काही चौकशा होणार आहेत. आमच्यावर दबाव येणार, हे आम्हाला माहिती आहे. परंतु अशा प्रकारच्या दबावाला आम्ही कदापी भीक घालणार नाही. आम्ही चौकशांना सामोरे जाऊ. आम्ही जनतेमध्ये जाऊन या खोट्या चौकशांचा पर्दाफाश करू. पण पोलिसांना यात निश्चितपणे सहकार्य करण्यात येईल.

कोणाच्या दबावातून चौकशा करण्यात येत आहेत, या प्रश्नावर आमदार वैभव नाईक म्हणाले की, राज्याचे गृहमंत्रालय कोणाकडे, गृहमंत्री कोण आहेत. शिवसेना संपविण्यासाठी भाजपला काय काय प्रयत्न करावे लागतात. दसरा मेळाव्यातसुद्धा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला जो प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे अशा चौकशा यापुढेही चालूच राहतील. त्या चौकशांना त्याच पद्धतीने उत्तर देण्यात येईल. सुमारे वीस वर्षांची माहिती घेऊन मला रत्नागिरी एसीबीने बोलावले आहे. मी माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. चौकशीसाठी वेळ लागला तर तोही मागून घेईल. पण, मी चौकशीला संपूर्ण सहकार्य करेन,असेही वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT