MNS Politics : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत असून, कोकण दौऱ्यावर गेलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे. तसेच त्यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सरकारला सल्ला देखील दिला आहे. तसेच त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरून देखील खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांचं नाव घेत निशाणा साधला आहे. यामुळे आता कोकणातील राजकीय वर्तुळात चर्चा होत असून वातावरण तापले आहे. दरम्यान, यावरून भाजपने देखील पलटवार केला आहे.
पालकमंत्रिपदावरून महायुतीचे नेते चर्चा सुरू असल्याचे सांगत आहेत. तर खुद्द शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले हे याचा निर्णय 15 ऑगस्टच्या आधी होईल, असा दावा करत आहेत. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम देखील यावर दावा करताना गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, असे सांगत आहेत. एकीकडे शिवसेनेचे दिग्गज नेते आणि स्थानिक आमदार गोगावलेंसाठी जोरदार फिल्डिंग लावताना दिसत आहेत.
दुसरीकडे राज ठाकरे यांनी पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला वाद हा क्षुल्लक असल्याचं म्हणत सरकारला टोला लगावला आहे. तसेच सरकारने निर्णय घेऊन नागरिकांचं हित सांभाळलं पाहिजे, असा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी, "पालकमंत्री पदावरून वाद होणे ही मला फालतू गोष्ट वाटते. अत्यंत फालतू गोष्ट आहे पालकमंत्री. पालक म्हणजे कोण आई-बाप ना? त्यांना आई-बाप मानायचे का?
माझं म्हणणं आहे की सरकार नावाची एक गोष्ट असते, सरकारने या गोष्टींचे निर्णय घ्यायचे असतात. सरकारने आपल्या लोकांचं जे काही हित आहे ते सांभाळायचं असतं. हे काय पालकमंत्र्याचं काम नाहीये," असे म्हणत सरकारवर रखडलेल्या पालकमंत्रिपदावरून आणि सुरू असणाऱ्या वादावरून टीका केली आहे.
याचदरम्यान राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांचं नाव घेतदेखील निशाणा साधला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर बोलताना नितीन गडकरी यांचा संदर्भ सांगितला. ते त्यांना भेटले तेव्हा गडकरी त्यांना म्हणाले की, कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले. आता ते कंटाळले कुणामुळे? कशामुळे कंटाळले? हे पाहावे लागेल.
आजपर्यंत जर रस्ता बांधायचा असेल तर त्यासाठी आधी जागा सरकारने घ्यायची असते आणि मग पुढे कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असतं. पण येथे वेगळंच घडलं आहे. जागा संपादित केलेली नाही, उलट कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देऊन मोकळे झाले आहेत. त्यांचे पैसेही गेलेत आणि त्या पैशातून टक्केवारीदेखील. पण रस्ता तिकडेच आहे. येथे वर्षानुवर्षे याच गोष्टीच होत आहेत.
आता स्थानिकांना ही गोष्ट समजणं गरजेचं असून, त्यांनी या गोष्टींना विरोध करणं गरजेचं आहे. सगळ्या ठिकाणी नुसतं आपले तटकरे-तटकरेची मुलगी, त्याच्यानंतर कोण ठाकूर-ठाकुरांचा मुलगा, त्याच्यानंतर अजून कोणीतरी हेच सुरू राहणार आहे. पण आमच्या लोकांना मात्र काही समजत नाही. हा काय प्रकार आहे. त्यांच्या त्यांच्यासमोर आयुष्यात काय वाढून ठेवलेलं आहे. अंधकार. निवडणुकीच्या तोंडावरती फक्त पैसे घ्यायचे आणि पैसे वाटायचे, बस मतदान होतंय. आमदार निवडून येतात, खासदार निवडून येतात. आमच्या पाया खालच्या जमिनी जातायत. असाच महाराष्ट्र विकला जात असल्याची टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.