kokan mango cashew farmers protest; Raju Shetti sarkarnama
कोकण

kokan protest : राजू शेट्टींसह ३७ जणांना रास्ता रोको अंगलट, पोलिसांनी गुन्हे दाखल केले; ठाकरेंच्या शिलेदारावरही FIR

kokan mango cashew farmers protest : नांदगाव येथील महामार्गावर रास्ता रोको केल्याप्रकरणी राजू शेट्टी, वैभव नाईक, सुशांत नाईक, संदेश पारकर आदींसह ३७ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Aslam Shanedivan

  • सरकारच्या लेखी आश्वासनानंतर राजू शेट्टी यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

  • तरीही कणकवली पोलिसांनी शेट्टींसह ३७ जणांवर गुन्हे दाखल केल्याने संताप वाढला.

  • आज मदत जाहीर न झाल्यास ‘वर्षा’वर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.

government relief News : कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईबाबत पुकारण्यात आलेले आंदोलन शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी तूर्तास स्थगित केले आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बागायतदारांना येत्या दोन दिवसात अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसान भरपाई जाहीर केली जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पण आता रास्ता रोको केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह ३७ जणांवर कणकवली पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्यानंतर शेट्टी यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त करत हल्लाबोल केला आहे. त्यांनी, अशा गुन्ह्यांना आम्ही भीत नाही, भीक घालतच नाही. अजून तुम्ही गुन्हे दाखल कराल, लाठ्या चालवाल, गोळ्या घालाल, तरी आम्ही गप्प बसणार नाही. आज बुधवार (ता. २५ मार्च) विधिमंडळाच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून आज जर का सरकारने मदत जाहीर केली नाही, तर वर्षावर धडक देणारच असा एल्गार राजू शेट्टी यांनी केला आहे.

आंबा आणि काजू पिकाच्या नुकसानीपोटी भरपाई मिळावी, यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.२३) नांदगाव येथे महामार्ग रोखला होता, तर जिल्हाधिकाऱ्यांनी २० मार्च ते ३ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला होता. मात्र राजू शेट्टी, वैभव नाईक, सुशांत नाईक, संदेश पारकर आदींसह शेतकऱ्यांनी नांदगाव येथील महामार्गावर रास्ता रोको केला. ज्यानंतर पोलिसांनी राजू शेट्टींसह ३७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

या सर्वांवर मनाई आदेशाचा भंग करणे, रस्त्यावर बसून आणि चालत जाऊन महामार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव करून महामार्ग रोखणे, जमावाला भडकविण्याचा प्रयत्न करणे, शेतकऱ्यांना भडकावणे आदी गुन्ह्यांची कलमे लावली आहेत.

यानंतर राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. त्यांनी, आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही गेली दोन महिने सातत्याने संघर्ष करतोय. मात्र सरकारने यावर निर्णय घेतला नाही. सरकारच्या बेपर्वाई वृत्तीनेच शेतकरी रस्त्यावर उतरले. याला जबाबदार सरकार आहे. या घटनेला सरकार दोषी असून दोष सरकारला द्यायला पाहिजे.

मात्र माझ्या सहित ३७ लोकांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यांना आम्ही भीत नाही, भीक घालतच नाही. अजून तुम्ही गुन्हे दाखल कराल, लाठ्या चालवाल, गोळ्या घालाल, आम्ही गप्प बसणार नाही. आज २५ मार्च असून विधिमंडळाच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज जर का सरकारने मदत जाहीर केली नाही, तर आम्ही वर्षावर धडक देणारच असा एल्गार राजू शेट्टी यांनी बोलून दाखवला आहे.

कोणावर गुन्हा दाखल

शेतकरी नेते राजू शेट्टी (रा. शिरोळ, कोल्हापूर), स्वस्तिक पाटील (रा. इचलकरंजी), माजी आमदार वैभव नाईक (रा. कणकवली), सुशांत नाईक (रा. कणकवली), संदेश पारकर (रा. कणकवली बाजारपेठ), तात्या भिवा निकम (तोंडवली), हनुमंत उर्फ राजा मधुकर म्हसकर (नांदगाव), उत्तम सुरेश लोके (नाटळ), प्रवीण अर्जुन वरुणकर (तळेरे), आनंद मामाजी ढोके (वाडातर), किरण हरिश्चंद्र टेंबुलकर (किंजवडे), गणेश गावकर (मिठमुंबरी), गणेश गोपाळ वाळके (मिठमुंबरी),

विलास मधुकर साळसकर (साळशी), विजय मधुकर पाडावे (किंजवडे), शंकर सूर्यकांत नानेरकर (कुणकेश्वर), राजेंद्र महादेव पाटील (जामसंडे), जितेंद्र जयप्रकाश जाधव (पडवणे), अजय सुधाकर नानेरकर (कुणकेश्वर), नरेश सखाराम डामरी (मिठमुंबरी), तिमीर सुधाकर माणगावकर (तळेबाजार), दिव्या दिनेश कोचरेकर (भरड नाका मालवण), अनिकेत अनिल फाटक (रेवतळे), गोविंद ऊर्फ आप्पा रामचंद्र चव्हाण (वायरी),

संजय गंगाधर नरे (कुंभारमाठ), संजय दत्ताराम गावडे (अणसूर वेंगुर्ले), विजय वासुदेव नाईक (वेतोरा), नागेश ऊर्फ पिंटू मोहन गावडे (गावडेवाडी वेंगुर्ले), व्यंकटेश जगन्नाथ नर (उंडील), महेंद्र दत्ताराम मांडवकर (पोंभुर्ले), अमोल प्रकाश जोशी (वाघोटण), प्रशांत पांडुरंग वाडेकर (पोंभुर्ले), रवींद्र भिकाजी पाळेकर (पाळेकरवाडी), काशिराम परशुराम पाळेकर (पाळेकरवाडी), संदीप हरिश्चंद्र डोळकर (गिर्ये), विजय सुरेश प्रभू (आंदुर्ले, कुडाळ), राजेंद्र शामराव गड्यानवर (गडहिंग्लज) आदींचा समावेश आहे.

FAQs :

1. आंदोलन का स्थगित करण्यात आले?
सरकारकडून नुकसान भरपाईबाबत लेखी आश्वासन मिळाल्यामुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले.

2. किती जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत?
राजू शेट्टींसह एकूण ३७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

3. शेट्टी यांनी सरकारला काय इशारा दिला?
आज मदत जाहीर न केल्यास ‘वर्षा’वर धडक देण्याचा इशारा दिला.

4. आंदोलन किती दिवसांपासून सुरू होते?
गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत होते.

5. पुढे काय घडू शकते?
सरकारने निर्णय न घेतल्यास मोठा मोर्चा आणि आंदोलन होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT