Uday Samant
Uday Samant Sarkarnama
कोकण

Konkan News : रत्नागिरी लोकसभा शिंदे गटाकडे : उद्योगमंत्र्यांचे बंधू असणार उमदेवार, सामंतांचे संकेत; राणेंकडे लक्ष

सरकारनामा ब्यूरो

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिवसेना (Shivsena शिंदे गट) आगामी काळातील सर्व निवडणुका युतीच्या माध्यमातून लढविणार असल्याचे अनेकदा जाहीर केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर, तर कुडाळ-मालवणचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहेत. मात्र, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. लोकसभेसाठी उद्योगमंत्री सामंतांचे बंधू किरण सामंत यांचे नाव आघाडीवर आहे. खुद्द मंत्री सावंत यांनीच ‘हे नाव चर्चेत असेल तर वावगे काय,’ असा सवाल करत रत्नागिरी लोकसभा मतदासंघातून शिंदे गटच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. (Ratnagiri Lok Sabha Constituency to Shinde Group: Industry Minister Uday Samant's information)

दरम्यान, या मतदारसंघातून नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश राणे यांनी निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधीत्वही केले आहे. तसेच, आगामी निवडणुकीसाठी ते उमेदवारही असू शकतात. त्यामुळे सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघावर दावा केला असला तरी राणेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आगामी निवडणुका आणि जागा वाटपाच्या दृष्टीकोनातून गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या पातळीवर भाजप आणि शिंदे गटाकडून चर्चा सुरू आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले की, आजच्या बैठकीत जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आलेला आहे. विद्यमान आमदार, खासदार असलेल्या जागा त्या त्या पक्षाला दिल्या जाणार आहेत. त्यानुसार सावंतवाडीतून केसरकर निवडून आलेले आहेत, त्यामुळे ते त्या ठिकाणहून पुन्हा लढतील. कुडाळ-मालवणबाबत दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. कणकवलीमधून नीतेश राणे पुन्हा निवडणूक लढवतील, म्हणजे या मतदारसंघात भाजपचा उमेदवार असेल. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार असणार हे पक्के आहे.

किरण सामंतांचे नाव चर्चेत आले तर त्यात वावगे काय?

शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यात सावंतवाडी मतदासंघातून वाद सुरू आहे. त्यात सामंत म्हणाले की, राजन तेली आणि मंत्री केसरकर हे परिपक्व राजकारणी आहेत. त्यामुळे त्या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होणार नाही, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधून किरण सामंत यांचे नाव चर्चेत आहे. त्यासंदर्भातही मंत्र्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, किरण सामंत यांच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. असे सांगतानाच किरण सामंत यांचे नाव चर्चेत असल्यास त्यात वावगे ते काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT