रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना–भाजप महायुतीने नगराध्यक्षपदासह 29 जागांवर दणदणीत विजय मिळवला.
महाविकास आघाडीला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले.
उद्योगमंत्री उदय सामंत व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक विजय मिळाला.
Ratnagiri News : राजेंद्र शेळके
रत्नागिरी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपा महायुतीने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत थेट नगराध्यक्षपदासह २९ जागावर विजय मिळवत मोठा राजकीय इतिहास रचला. महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या ३ जागा आल्या. उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा विजय मिळविला असून ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांचे पुरते पानिपत झाल्याचे स्पष्ट झाले.
रत्नागिरी पालिकेच्या संत गाडगेबाब सभागृहात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीपासूनच नगराध्यक्षपदाच्या महायुतीच्या उमेदवार शिल्पा सुर्वे यांनी आघाडी घेतली. प्रत्येक प्रभागात त्यांना आघाडी मिळाली. महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी राजेश सावंत या पिछाडीवर गेल्या.
तिसरी फेरी झाली आणि प्रभाग १२ मधील महायुतीचे उमेदवार राकेश नागवेकर आणि जागृती पिलणकर या विजयी झाल्याचे निश्चित झाल्यानंतर जल्लोष करत पालिके बाहेर आल्या आणि रस्त्यावर जमलेल्या महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. त्यानंतर लागोपाठ नगरसेवकपदाचे निकाल बाहेर पडू लागले. प्रभाग २ चा निकाल लागताच शिवसेनेच्या स्मितल पावसकर विजयी मुद्रेने बाहेर आल्या. विजयी उमेदवार बाहेर येईल तशा बाहेर घोषणा आणि आतषबाजी होत होती. यावेळी महाविकास आघाडीच्या गोटात स्मशान शांतता पसरली होती.
एवढ्यात कोकणनगर हा प्रभाग ४ मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे केतन शेट्ये आणि फौजिया मुजावर हे दोन्ही उमेदवार विजयी होऊन पालिकेच्या गॅरलीमध्ये येऊन हात उंचावत विजयाची खूण केल्यानंतर महाविकास आघाडीमध्येही जल्लोष सुरू झाला. परंतु हा आनंद अल्पजीवी ठरला.
लगेच प्रभाग ६ मधील मेधा कुळकर्णी आणि राजीव कीर निवडून आल्यानंतर त्यानंतर महायुतीची विजयाची घोडदौड सुरूच राहिली. प्रभाग १५ मध्ये महायुतीला एकीकडे आनंद आणि दुसरीकडे निराशा अशी परिस्थिती झाली. शिवसेनेचे सुशांत उर्फ मुन्ना चवंडे पराभूत झाले आणि उबाठाचे अमित विलणकर निवडून आले. भाजपच्या वर्षा ढेकणे निवडून आल्या. प्रभाग १४ मध्येही चांगलीच रस्सीखेच होईल, अशी अपेक्षा होती. शिवसेनेच्या मोरे यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे सेनेच्या बंटी कीर यांना फटका बसण्याची शक्यता होती. परंतू कीर सर्वांवर मात करत विजयी झाले.
शिल्पा सुर्वे यांना कायम मताधिक्य
अर्ध्या फेऱ्यानंतरच महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे निवडून आल्याचे स्पष्ट झाले. प्रत्येक फेरीला त्यांना मताधिक्य मिळत गेले. या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ३२ पैकी महायुतीने २९ जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीला ३ जागांवर समाधान मानावे लागले.
आम्हाला एवढ्या मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल हे शक्यच नाही. विधानसभेला २ हजाराने पिछाडीवर असताना आता १० हजार म्हणजे काहीतर गडबड आहे. लांबलेल्या निकालामुळेच संशयाचे वातावरण आहे. आम्हाला हे मान्य नाही. लोक सांगतात केलेले मतदान गेले कुठे. एकूणच निकाल संशयास्पद आहे.- प्रशांत साळुंखे, शहरप्रमुख, ठाकरे शिवसेना
1. रत्नागिरी पालिका निवडणुकीत महायुतीने किती जागा जिंकल्या?
महायुतीने नगराध्यक्षपदासह 29 जागा जिंकल्या.
2. महाविकास आघाडीला किती जागा मिळाल्या?
महाविकास आघाडीला अवघ्या 3 जागा मिळाल्या.
3. या विजयामागे कोणाचे नेतृत्व होते?
उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळाला.
4. ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव कसा ठरला?
उपनेते बाळ माने यांचे रत्नागिरीत मोठ्या फरकाने पराभव झाल्याने हा पराभव निर्णायक मानला जात आहे.
5. या निकालाचा राजकीय अर्थ काय काढला जात आहे?
कोकणात महायुतीची ताकद अधिक मजबूत झाल्याचे हे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.