Ratnagiri ZP election politics; Uday Samant sarkarnama
कोकण

Uday Samant : सभापती निवडीत सामंतांचे ‘धक्कातंत्र’, बंडखोरांशी भिडलेल्या नव्या चेहऱ्यांना शिवसेनेकडून बक्षीस

shivsena uday samant zilla parishad election politics : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून शिवसेनेकडून ‘धक्का तंत्रा’चा वापर करण्यात आला आहे. यामुळे जुन्या चेहऱ्यांना धक्का बसला आहे.

Aslam Shanedivan

  1. जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणुका बिनविरोध पार पडल्या.

  2. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार उदय सामंत यांनी जुने चेहरे बाजूला करून नवीन नेतृत्वाला संधी दिली.

  3. विधानसभा निवडणुकीत निष्ठा दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना सभापतीपद देऊन पक्षाने त्यांचा सन्मान केला.

Ratnagiri ZP election politics : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी जुन्या चेहऱ्यांना बाजूला करून अनेक इच्छुकांना धक्का दिला. पूर्णपणे नवीन फळीला संधी दिली. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत पक्षाशी एकनिष्ठ राहून बंडखोरांचा पराभव करणाऱ्या शिलेदारांना सभापतिपदाचे बक्षीस देण्यात आले.

समाजकल्याण सभापतिपदी सुयोग कांबळे, महिला व बालकल्याण सभापतिपदी मयुरी शिर्के, कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदी महेश नाटेकर, तर अर्थ आणि शिक्षण सभापतिपदी नंदकुमार मुरकर यांची निवड झाली. सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारी या अर्जांची छाननी प्रक्रिया झाली.

सव्वातीन वाजता विशेष सभा लावून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडून आलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. विरोधी अर्ज दाखल न झाल्याने या चारही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे त्यांनी जाहीर केले. या निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी रोपटे देऊन अभिनंदन केले.

त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्ष विलास चाळके यांनी देखील सभापतींचे अभिनंदन केले. त्यानंतर दत्त मंदिरात जाऊन त्यांनी आशीर्वाद घेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. नव्या निवडींमध्ये सर्वांत मोठी चर्चा ही अर्थ व शिक्षण सभापतिपदाची आहे.

जिल्हा परिषदेचे अत्यंत अभ्यासू सदस्य म्हणून ओळखले जाणारे उदय बने यांचा पराभव करणारे शिवसेनेचे शिलेदार नंदकुमार मुरकर यांच्या विजयाची दखल घेत डॉ. उदय सामंत यांनी त्यांना ‘अर्थ व शिक्षण सभापती’पदाची महत्त्वाची जबाबदारी दिली. माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी हातखंबा गटातून बंडखोरी केल्यामुळे तेथील लढत अत्यंत चुरशीची झाली होती.

या बंडखोरीला न जुमानता ॲड. सुयोग नंदकुमार कांबळे यांनी कदम यांचा पराभव केला आणि पक्षाची जागा राखली. त्यांच्या या कामगिरीचे बक्षीस म्हणून कांबळे यांची ‘समाजकल्याण सभापती’पदी वर्णी लागली. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची निवड झाली असून, त्यांच्याकडे बांधकाम व आरोग्य विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

असे आहेत सभापती...

समाजकल्याण : सुयोग कांबळे

महिला व बालकल्याण : मयुरी शिर्के

कृषी व पशुसंवर्धन : महेश नाटेकर

अर्थ आणि शिक्षण : नंदकुमार मुरकर

FAQs :

1. जिल्हा परिषद सभापती निवडणूक बिनविरोध का झाली?
पक्षांतर्गत एकमत आणि नेतृत्वाच्या निर्देशांमुळे निवडणूक बिनविरोध पार पडली.

2. जुने चेहरे का बदलण्यात आले?
नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी आणि पक्षात ऊर्जा आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

3. निष्ठावंत कार्यकर्त्यांना काय बक्षीस मिळाले?
त्यांना सभापतीपद देऊन सन्मानित करण्यात आले.

4. या निर्णयामागे कोणाचे नेतृत्व होते?
एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उदय सामंत यांनी हा निर्णय राबवला.

5. याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
पक्षाची संघटना मजबूत होऊन भविष्यातील निवडणुकांमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT